Jitendra Awhad Vs Ajit Pawar sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad Vs Ajit Pawar : जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवारांचा उमेदवार ठरला, 'करेक्ट कार्यक्रम' करणार?

Akshay Sabale

2019 मध्ये सकाळी झालेला शपथविधी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट असो अजित पवार यांना थेट भिडण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनीच केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब यांच्याशी जवळीक आणि आक्रमकतेमुळे जितेंद्र आव्हाड यांना रोखण्यासाठी विविध राजकीय डाव टाकण्यात येत आहेत.

लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आलेल्या जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांच्याविरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चेंबांधणी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आव्हाडांविरोधात त्यांच्याच जुन्या मित्राला अर्थात नजीब मुल्ला यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उतरवलं जाण्याची शक्यता आहे.

नजीब मुल्ला हे एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांचे सहकारी होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नजीब मुल्ला यांनी अजित पवार ( Ajit Pawar ) यांना साथ दिली. मुल्ला यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीसपदही आहे. तसेच, कळवा-मुंब्रा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त प्रमाणात आहे. नजीब मुल्ला ( Najib Mulla ) हे अल्पसंख्याक चेहरा आहेत. त्यामुळे मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नजीब मुल्ला यांना राष्ट्रवादीकडून आव्हाडांविरोधात मैदानात उतरवलं जाऊ शकते.

निधीवरून मुल्ला आणि आव्हाडांमध्ये वाकयुद्ध

मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्रात विकासासाठी सरकारकडून 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच विकासकामांना सुरूवात होणार आहे, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली.

तर हा निधी प्रभागनिहाय खर्च होणार आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघातील मागील 10 वर्षांत कथित विकासकामांची दर आठवड्यातून एकदा पोलखोल केली जाणार असल्याचा इशारा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.

निधी मिळाल्यानं मुंब्रा-कळव्याच्या विकासाची खरी सुरूवात आता झाली आहे. येथील आमदारांकडून विकासाच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत पीए आणि ठेकेदारांच्या मागमीप्रमाणे विकास निधीचा कसा व कुठे वापर झालेला आहे, याचा लेखाजोखा यापूर्वीच पुढे आला आहे. मुंब्रा-कळवा क्षेत्रासाठी अल्पसंख्याक विभागाकडून विशेष निधी दिला जाणार आहे. त्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फतही कामे केली जाणार आहे, असं परांजपे यांनी सांगितलं.

निधी दिला तरी नागरिक गद्दारी स्वीकारत नाहीत

"मुंब्र्यासाठी 50 कोटींचा निधी दिला, त्याबद्दल अजित पवार यांचे आभार मानतो. पण, 50 कोटींचा निधी देऊन तुम्ही नागरिकांना विकत घ्याल, अशी अपेक्षा ठेवू नका. बारामतीकरांना एक हजार कोटींचा निधी दिला होता. बारामतीकरांनी गुर्मी उतवली ना? नागरिक गद्दारी कधीच स्वीकारत नसतात," अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

"आमच्याशी गद्दारी केल्यानंतर मी अजित पवार यांच्यावर तोफ डागली होती. त्यामुळे मला निधी ते हात आखडता घेतील. पण, आता माझ्याविरोधात ज्याला उभे करायचं आहे, त्याच्या नावे हा निधी दिलेला आहे. आपल्या वॉर्डातील स्लॉटर हाउसच्या रस्त्याची काय अवस्था आहे, हे त्यांनी पहावे," असं म्हणत आव्हाड यांनी नजीब मुल्ला यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT