Ashish Shelar, Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election: कवितेतून शेलारांचा ठाकरेंवर बाण; मोडला जरी गटाचा कणा,'पक्षप्रमुख' तेवढं म्हणा!

सरकारनामा ब्युरो

Ashish Shelar On Uddhav Thackeray : देशभरात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) बिगुल वाजलं आहे. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्षांकडून विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात तर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक नेते पत्रकार परिषदेतून तर काही नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच आता मुंबई भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर ट्विटरच्या माध्यमातून बोचरी टीका केली आहे. शेलारांच्या या टीकेमुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा विरोधकांवर टीका करतात. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींपासून (Rahul Gandhi) शिवसेना खासदार संजय राऊतांपर्यंत सर्वांना ते भिडतात. नुकतेच दोन दिवसांपूर्वी शेलार यांनी 'एकापाठोपाठ भ्रष्टाचारी चालले जेलात...रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?' असे म्हणत काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. अशातच आता, मोडला जरी पक्षाचा संसार, मोडला जरी गटाचा कणा तुम्ही इज्जत देऊन "पक्षप्रमुख" तेवढं म्हणा! असं म्हणत ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आशिष शेलार यांनी आपल्या एक्सवर कवी कुसुमाग्रजांच्या फक्त लढ म्हणा या कवितेचं विडंबन करत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "ओळखलत का राहुलजी मला? मुंबईतून आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसले, नंतर हसले बोलले वरती पाहून काँग्रेसशी मैत्री केली, राम मंदिरावर अहंकारी टीका केली, गेला अख्खा पक्षच मला सोडून.

नेते गेले, चिन्ह गेले, नगरसेवक, शाखाप्रमुख पण गेले. दोन मुलगे आणि दोन मातोश्री तेवढेच पदरी वाचले. बोलक्या, संजयला घेऊन, राहुलजी, आता लोकसभा लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठले, खोके नको राहुलजी, जरा एकटे एकटे वाटले. जमले तर..., सभेला चार कार्यकर्ते तेवढे पाठवा. दोन-चार जागा देऊन आमची इज्जत तेवढी वाचवा! मोडला जरी पक्षाचा संसार; मोडला जरी गटाचा कणा, तुम्ही इज्जत देऊन, "पक्षप्रमुख" तेवढं म्हणा! या कवितेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी मैत्री केल्यामुळे शिवसेनेचे नेते ठाकरेंना सोडून गेल्याचे संकेत शेलार यांनी दिले आहेत, तर आता शेलारांच्या या कवितेला ठाकरे गट कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT