Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात; २७ फेब्रुवारीच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

Sachin Waghmare

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष तयारी करीत आहेत. महाविकास आघाडी व महायुतीच्या घटक पक्षात जागावाटपाची चर्चा सुरू आहे. यामध्ये सध्या तरी महाविकास आघाडीने बाजी मारली असल्याचे चित्र आहे. येत्या चार दिवसांत मविआचे जागावाटप फायनल होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून, जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागावाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीत जागावाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.

राज्य निवड मंडळाच्या बैठकीआधी प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात मविआ आघाडी मजबूत आहे, आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सर्व मुद्द्यांवर सहमती झाली आहे. काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे, लोणावळा येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. या शिबिरात संघटन मजबुत करण्याविषय़ी चर्चा झाली आहे, मुंबई काँग्रेसच्या तयारीचा आढावाही घेतला जात असल्याचे रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या एकाही भ्रष्ट नेत्यावर कारवाई नाही

निवडणुका आल्यामुळे विरोधी पक्षांच्या मंडळींवर सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून धाडी टाकल्या जात आहेत. परंतु भाजपच्या एकाही भ्रष्ट नेत्यावर कारवाई केली जात नाही. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची वल्गना भारतीय जनता पक्षाने केली होती. परंतु, ज्या लोकांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच भाजपमध्ये घेऊन भ्रष्टाचारयुक्त भाजप केला आहे. अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्यांच्यावर छापे टाकले का? उलट त्यांना सत्तेत घेऊन उपमुख्यमंत्री केले, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या ३०३ खासदारांमध्ये विरोधी पक्षातील १६५ जण

आदर्श घोटाळ्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी संसदेत केला व त्यानंतर अशोक चव्हाणांना भाजपमध्ये प्रवेश देत राज्यसभा खासदार केले. भाजपने भ्रष्टाचारी मंडळींना सुरक्षाकवच दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ३०३ खासदारांमध्ये विरोधी पक्षातील १६५ जण आहेत, तर काँग्रेसचे ६७ जण आहेत, ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे काय भ्रष्टाचारमुक्त भारत करणार ? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, AICC चे सचिव आशिष दुआ, माजी मंत्री अनिस अहमद, उपाध्यक्ष प्रशासन व संघटन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्ते राजू वाघमारे उपस्थित होते.

R

SCROLL FOR NEXT