Mahavikas Aghadi Sarkarnama
मुंबई

Assembly Election 2024 : नाना पटोले आपलं म्हणणं खरं करणार ,काँग्रेस स्वबळावर लढणार? 288 जागांवर चाचपणी सुरू

Chaitanya Machale

Mumbai News : लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षापेक्षा अधिक यश संपादित करणाऱ्या काँग्रेसचा आत्मविश्वास आता चांगलाच वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेले मोठे यश पाहता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी का? याची चाचपणी काँग्रेसने सुरु केली आहे. राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छूकांकडून अर्ज काँग्रेसने मागविले असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्याबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली होती. पाच वर्षापूर्वी 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा केवळ एकच खासदार निवडून आला होता. तर 2024 च्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत उतरलेल्या काँग्रेसला मोठे यश मिळाले. या निवडणुकीत काँग्रेसचे 13 खासदार विजयी झाले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना दिलेला कौल लक्षात घेता आता काँग्रेसच्या नेत्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता पुढील काही महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करायला सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेस देखील मागे नाही. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांकडून काँग्रेसने अर्ज मागविले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये प्रमुख पक्ष असतानाही काँग्रेस येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपला बी प्लॅन तर तयार करत नाही ना ? असा प्रश्न विचारला जात आहे.

काँग्रेस (Congress) पक्षाकडून सर्व विधानसभा इच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 10 जुलैपर्यंत हे अर्ज प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात जमा करण्याचे आवाहन एका परिपत्रकातून करण्यात आले आहे. हा अर्ज जमा करताना सर्वसाधारण उमेदवारांना पक्षनिधी म्हणून 20 हजार रुपये, तर अनुसुचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांना 10 हजार रूपये द्यावे लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार धक्का दिल्यानंतर विधानसभेची निवडणूक देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविण्याची जोरदार चर्चा केली जात आहे. असे असतानाही काँग्रेसने इच्छूकांचे अर्ज मागविल्याने याची उलट सुलट चर्चा आता सुरू झाली आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्री मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक होणार आहे. यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांचे सर्व उमेदवार कशा पद्धतीने विजयी होतील, यावर चर्चा होणार आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे एका उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागणार असल्याचे निश्चित आहे. या निवडणुकीत महायुतीकडून 9 तर महाविकास आघाडीकडून तीन जण रिंगणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT