Maharashtra Government Ministers : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट आणि याच विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यामधील वाद काही दिवसांपूर्वीच चव्हाट्यावर आला होता. आता पुन्हा एकदा दोन मंत्र्यांमध्ये कामकाजावरून वाद सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. सरकारच्या एका जीआरमुळे सहकार आणि पणन मंत्र्यांमध्ये कामकाजावरून टोकाचे मतभेद आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री आहेत. तर भाजपचे नेते जयकुमार रावल यांच्याकडे पणन खाते आहे. राज्य सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत सहकार, पणन व वस्त्रोद्योग हे तीन स्वतंत्र विभाग असून तिन्ही उपविभागांसाठी स्वतंत्र मंत्री आहेत. भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या वस्त्रोद्योग खाते आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अवर सचिव माधवी शिंदे यांच्या सहीचा जीआर गुरूवारी काढण्यात आला आहे. या जीआरमध्ये पणन खात्याचे मंत्री कुठल्या खात्याचे कामकाज पाहणार याची माहिती देण्यात आली आहे. या विभागाशी संबंधित कामकाजाबाबत पहिल्यांदाच असा जीआर काढण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
जीआरमध्ये म्हटले आहे की, पणन विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या पणन सहकार संस्थांचे वैधानिक कामकाज पणन विभागामार्फत पणन मंत्र्यांच्या मान्यतेने करणे आवश्यक आहे. पणन विभागाच्या अखत्यारित असलेल्या ग्राहक सहकारी संस्था, सहकारी खरेदी विक्री संघ, जिनिंग व प्रेसिंग संस्था, सहकारी प्रक्रिया संस्था, फळे व भाजीपाला व इतर सर्व पणन प्रक्रिया सहकारी संस्था, तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये स्थापन पणन सहकारी संस्था या सर्व संस्थांशी संबंधित वैधानिक कामकाज पणन विभागामार्फत पणन मंत्री यांच्या मान्यतेने करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
जीआरनुसार पणनमंत्री रावल यांचे अधिकारक्षेत्र निश्चित करण्यात आल्याचे दिसते. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सहकार खाते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तर पणन खाते अब्दुल सत्तार यांच्याकडे होते. त्यावेळी असा जीआर काढण्यात आलेला नव्हता. यापूर्वीचे महाविकास आघाडीचे सरकार आणि फडणवीसांच्या पहिल्या टर्ममध्ये एकाच मंत्र्यांकडे सहकार आणि पणन विभाग होता. त्यामुळे त्यावेळी वादाचा प्रश्नच उद्भवला नाही.
आता मात्र पणन मंत्र्यांच्या कामकाजाबाबत स्वतंत्र जीआर काढावा लागल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. बाबासाहेब पाटील आणि जयकुमार रावल यांच्यामध्ये कामकाजाबाबत टोकाचे वाद झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच पहिल्यांदाच सरकारला कामकाजाबाबत जीआर काढावा लागला का, या चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.