Raj Thackeray, Ajit Pawar
Raj Thackeray, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

आपण महाराष्ट्रात राहतो! अजितदादांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण

सरकारनामा ब्युरो

लखनौ : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचं कौतुक केलं आहे. योगींनी बुधवारपर्यंत विविध धार्मिक स्थळांवरील सहा हजार भोंगे उतरवल्यानंतर राज यांनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केलं व आभारही मानले. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खडेबोल सुनावले आहेत. तसेच आपण महाराष्ट्रात राहत असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. (Ajit Pawar Latest Marathi News)

माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरेंवर टीका केली. भोंगे हटवण्याच्या मुद्यावर ते म्हणाले, योगींनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्राची शिकवण वेगळी आहे. सुसंस्कृत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सर्व जातीधर्माला न्याय देणारा महाराष्ट्र आहे. अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. इतके वर्ष हे सुरू आहे. पण त्याआधी कुणी त्याला विरोध केला नव्हता. आता ते मागणी करत आहे. उद्या त्यातून पुन्हा नवे मुद्दे येतील. उच्च न्यायालयाने त्याबाबत काही निर्णय घेतला तर इतर भाविकांवरही परिणाम होईल.

भावनेच्या आहारी जाऊन समाजात तेढ निर्माण करायचे, भारतातील एका प्रगत राज्यात दरी निर्माण करून, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही. सगळ्यांनी थोडा मनाचा मोठेपणा दाखवण्याची गरज आहे. या घटनांतून जर जखमा झाल्या तर त्या खोलवर जातात. नको ते प्रश्न निर्माण होतात. ज्याची आज अजिबात गरज नाही. महाराष्ट्रात आपण शाहू-फुले-आंबेडकर, शिवाजी महाराजांचे नाव घेतो. त्यांनी सर्वांना सोबत घेतले. आज महाराष्ट्रसमोर महागाई, कोळसा टंचाई असे अनेक मुद्दे असताना हनुमान चालिसा आणि भोंगा हे मुद्दे उपस्थित केले जातात, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरेंनी काय म्हटलं आहे?

राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'! महाराष्ट्र सरकारला सदबुध्दी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असं ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केलं आहे.

मशिदीवरील भोंग्यांवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार विरूध्द मनसे (MNS) आणि भाजप (BJP) असा राजकीय वाद रंगला आहे. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना पोलिसांची परवानगी घेणे बंधनकार केले आहे. याच पावलावर पाऊल टाकत योगी सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. पण त्यावरच न थांबता योगी सरकारने मागील काही दिवसांत विविध धार्मिक ठिकाणांवरील सहा हजारांहून अधिक भोंगे हटवले आहेत. तर 30 हजारांहून अधिक भोंग्यांच्या आवाजावर नियमानुसार निर्बंध लादले आहेत.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, धार्मिक स्थळांवरील परवानगी न घेतलेले भोंगे हटवण्याची मोहिम राज्यभर हाती घेण्यात आली आहे. तसेच इतर सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मान्यतेप्रमाणे आवाज ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत बुधवार दुपारपर्यंत सहा हजार 31 भोंगे हटवण्यात आले आहेत. सर्वाधित 1366 भोंगे वाराणसी विभागातील असून त्यामध्ये मेरठ, बरेली आणि कानपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT