Abdul Karim Telgi and Subodh Kumar Jaiswal
Abdul Karim Telgi and Subodh Kumar Jaiswal File Photo
मुंबई

तेलगीचं भूत पुन्हा बाहेर? महाराष्ट्र सरकार घेरणार सीबीआय संचालकांना

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) करीत आहे. या प्रकरणी सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावले होते. यानंतर आता अब्दुल करीम तेलगी (Abdul Karim Telgi) सूत्रधार असलेल्या बनावट मुद्रांक प्रकरणात सीबीआय संचालक सुबोधकुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांना महाराष्ट्र सरकार घेरण्याची शक्यता आहे.

बनावट मुद्रांक प्रकरणात जयस्वाल यांच्यावर पुण्यातील न्यायालयाने 2007 मध्ये ताशेरे ओढले होते. हे ताशेरे रद्द करावेत, यासाठी जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात 2007 मध्येच धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित होते. महाराष्ट्र सरकारने मागील महिन्यांत प्रथमच या प्रकरणी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. या प्रकरणाची तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एवढे दिवस थंड असलेले हे प्रकरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. यामुळे जयस्वाल यांच्यावरील ताशेरे कायम राहणार की रद्द केले जाणार, याचा निर्णय लवकरच होईल.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने नुकतेच जयस्वाल यांना समन्स बजावले होते. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) प्रमुख रश्मी शुक्ला यांनी बदली रॅकेट संबंधित एक रेकॉर्डिंग केले होते. त्याचा एक अहवालही त्यांनी तयार केला होता. हा अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात वाचून प्रसारमाध्यमांसमोर ठेवला होता. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अज्ञात व्यक्तींविरोधात गोपनीयता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण घडले त्यावेळी जयस्वाल हे राज्याचे पोलीस महासंचालक होते. नंतर त्यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती.

याच प्रकरणात जयस्वाल यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 9 ऑक्टोबरला सीबीआय संचालकांना समन्स बजावले. त्यांना 14 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. हे समन्स ई-मेलने पाठवण्यात आले होते. यात मुंबई पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती. परंतु, सीबीआयचे संचालक मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते.

दरम्यान, अनिल देशमुखांवरील 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी सीबीआयने मागील आठवड्यात मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावले होते. कुंटे यांना ८ ऑक्टोबरला सीबीआयच्या मुंबई कार्यालयात तर पांडे यांनी ९ ऑक्टोबरला सीबीआयच्या दिल्ली कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी सीबीआय चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला होता सीबीआयने आमच्या कार्यालयात येऊन चौकशी करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर आठवडाभरातच थेट सीबीआय संचालकाना समन्स बजावण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT