Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Shiv Sena: शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईकरांचा कौल कुणाला? ठाकरे की शिंदे

सरकारनामा ब्यूरो

राज्याच्या राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेल्या मुंबईत विधानसभेचे एकूण ३६ मतदारसंघ आहेत. नव्या राजकीय समीकरणामुळे (Maharashtra Politics) आता महायुतीकडे २३ तर महाविकास आघाडीकडे १३ आमदार आहेत.

आगामी विधानसभेत विशेषतः शिवसेनेतील फुटीनंतर होणाऱ्या निवडणुकीत मुंबईचा मतदार कसा व्यक्त होतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) सहानुभूतीचा फायदा होईल. उद्धव ठाकरे काँग्रससमवेत असल्याने त्यांनाही फायदा होणार आहे.

मुस्लिम आणि दलित मते महाविकास आघाडीसोबत आहेत. त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीच्यावेळी आला. सर्वच मतदारसंघांत मराठी आणि मुस्लिम मतांचा टक्का जास्त असल्याने त्याचा आघाडीच्या उमेदवारांनी निश्चितच फायदा होणार आहे.

आघाडीला मुंबईत सध्या तरी सकारात्मक चित्र दिसत असले तरी त्यांच्यात जागावाटपाचा तिढा सुरू झाला आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहऱ्यावरूनही ‘मविआ’मध्ये काही दिवस हेवे-दावे पाहायला मिळाले. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरविण्यावर शरद पवार यांनी कोणाचे नाव न घेता संबंधितांना खडे बोल सुनावल्याने जागावाटपाचा पेच वाढत जाईल, असे दिसते.

मनसेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले नव्हते; परंतु विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्याचा फटका आघाडीला किती प्रमाणात बसतो यावर विजयाची गणिते ठरणार आहेत. याउलट उत्तर भारतीय मतांचा कल महायुतीकडे आहे. तो विधानसभेलाही कायम राहण्याची शक्यता आहे.

युतीचा विकासावर भर

मतदारांच्या मनात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’सह विकासाचे विश्वासचित्र बिंबवण्याची प्रक्रिया महायुतीने जोराने सुरू केली आहे.त्यासाठी कित्येक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सोबतच अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो मार्ग, भूमिगत मेट्रो, बुलेट ट्रेन, वांद्रे-वरळी सी-लिंक, वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट, मुंबईतील घरे इत्यादी प्रकल्पांच्या मुद्द्यांवर प्रचारात भर असेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याने महायुतीसमोरील पेच कायम आहे. धारावी पुनर्विकासाचा मुद्दाही महत्वाचा ठरणार आहे.

ठाण्यात शिंदेंचा करिष्मा कायम?

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय बंडाचे बीज याच जिल्ह्यात रुजले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने राजकीय दृष्ट्या ठाण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. जिल्ह्यात आता महायुतीकडे १५ तर आघाडीकडे दोन आमदार आहेत. आता सगळी परिस्थिती बदलली आहे. कल्याण ग्रामीण, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि उल्हासनगर येथे विद्यमान आमदारांपुढे धोक्याची घंटा वाजली आहे.

पालघर जिल्ह्यातील सहापैकी बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. तर सीपीएम, शिवसेना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे. डहाणू हा ‘सीपीएम’चा बालेकिल्ला आहे. मात्र सद्यःस्थितीत भाजप ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. बहुजन विकास आघाडी वाढीसाठी सध्या हितेंद्र ठाकूर मैदानात उतरले आहेत.

महायुतीच्या जमेच्या बाजू

  •  सत्ता असल्याने आणलेला विकासात्मक निधी

  • निवडणूक लढण्याचे प्रभावी तंत्र माहीत असलेली कार्यकर्त्यांची फळी

महायुतीच्या नकारात्मक बाजू

  • इच्छुकांमुळे अंतर्गत नाराजीची शक्यता

  • स्थानिक पातळीवर सुप्त संघर्ष

  • पक्ष फोडल्याचा मतदारांमध्ये राग

महाआघाडीच्या जमेच्या बाजू

  • उद्धव ठाकरेंच्या सहानुभुतीचा फायदा

  • सर्वच मतदारसंघांत मराठी आणि मुस्लिम मतांचा टक्का अधिक

  • पक्ष फोडीमुळे भाजपविरोधात रोष

महाआघाडीच्या नकारात्मक बाजू

  • शिवसेना (उबाठा) ने हिंदुत्व सोडल्याचा होणारा आरोप

  • विकासाला विरोध अशी झालेली प्रतिमा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT