Mumbai News, 14 Aug : महाराष्ट्रात सध्या सरकारमध्ये जनहिताची कोणतीच कामे होताना दिसत नाहीत. कारण सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे. त्यातून रोजच एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. कुणी श्रीनगरला जाऊन बसत आहे. सरकारमध्ये रोज फक्त कुरघोड्या-कुरबुरी अशी ‘कु’ची बाराखडी सुरू आहे.
हे सरकार जनतेचे आहे, असे सत्ताधारी म्हणत असले तरी हे नाराजांचे सरकार आहे, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून महायुती सरकारवर घणाघात करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी, रायगडच्या पालकमंत्रिपदावरून नाराज असलेले आमदार भरत गोगावले आणि नुकतंच भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अजितदादांबाबत केलेलं वक्तव्य.
या सर्वांचा समाचार या अग्रलेखातून घेण्यात आला आहे. सामनात लिहिलं की, राज्यात मिंधे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचे काय भले झाले? होणार तरी कसे? कारण आपापसातील कुरघोड्या आणि कुरबुरींमधून सत्ताधाऱ्यांना तर मिळायला हवा? यांचा सगळा वेळ आणि शक्ती एकमेकांचे पत्ते कापण्यात आणि एकमेकांवर कुरघोड्या करण्यात, एकमेकांचे पाय खेचण्यात आणि नाराजीचा ‘राग’ आळवण्यातच जात आहे.
या नाराजी नाट्यामध्ये प्रमुख भूमिका करणारे उपमुख्यमंत्री शिंदे हे नेहमीप्रमाणे आघाडीवर आहेत. सरकारमधील अंतर्गत नाराजीचे ते स्वयंघोषित ‘ब्रँड अॅम्बेसेडर’च आहेत. त्यामुळे त्यांना अनेकदा नाराजीची उचकी लागते आणि ती दाखवून देण्याचा त्यांचा उद्योग सुरू असतो. आताही त्यांना अशीच उचकी लागली आणि मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते गैरहजर राहून थेट श्रीनगरला जाऊन बसले.
श्रीनगरात ते कशासाठी गेले? त्यांनी आसाम-गुवाहाटीला’ जायला हवे होते. नाहीतर त्यांचे नाराजीनंतरचे दुसरे यशस्वी ठिकाण साताऱ्यातील ‘दरे’ गावी जायला हवे होते. उपमुख्यमंत्री शिंदेंकडे महाराष्ट्र मंत्रिमंडळातली मलईदार खाती आहेत. नगरविकास, गृहनिर्माण, रस्ते उपक्रम. त्यात हे महाशय कधी लक्ष घालतात? असा सवाल करत त्यांनी शिंदेवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
तर मुख्यमंत्री फडणवीस हे शिंदेना धक्के देत असतात त्यामुळे त्यांचं मन मंत्रालयात रमत नाही. त्यामुळे ते दिल्लीला जातात ते फडणवीसांवर कारवाईची मागणी करतात. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांची भेट घेऊन त्यांनी फडणवीसांबाबतच्या नाराजीचा पाढा वाचला होता. शिवाय फक्त शिंदेच नव्हे तर सत्तापक्षांमधील इतरही मंत्री-नेते आणि पदाधिकारी यांचेही हेच सुरू आहे.
मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला शिंदेंसह त्यांचे दुसरे मंत्री भरत गोगावले यांनीही दांडी मारली. गोगावलेंनी दिल्ली गाठली. तेथे म्हणे त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेत राज्यातील भाजप नेतृत्वाविरोधात रडगाणे गायले. रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे रडगाणे सुरू राहणार आहे.
तिकडे भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उचकी लागली व दादांची ‘जनाची मनाची लाज’त्यांनी बाहेर काढली. आमदार निधी आणि खात्यांना दिला जाणारा निधी यावरूनही अर्थखाते सांभाळणारे अजित पवार व शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये ‘तू तू-मैं मैं’ सुरूच असते. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या सरकारमध्ये जनहिताची कोणतीच कामे होताना दिसत नाहीत. कारण ते एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहेत, अशी टीका सामनातून कऱण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.