Missing Womens News : Sarkarnama
मुंबई

Missing Womens In Maharashtra: महिला- बालकांसाठी महाराष्ट्र सर्वाधिक सुरक्षित; फडणवीसांनी आकडे मांडले

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: राज्यातील शेकडो महिला आणि बालके बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. बाल लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांतही सातत्याने वाढ झाली आहे. यासंदर्भात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. विरोधकांच्या या प्रश्नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेत आकडेवारीनिशी उत्तरे दिली. इतर राज्यांच्या तुलनेत मुंबई ही महिलांना सर्वाधिक सुरक्षित वाटते, असं उत्तर देत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर भाष्य केलं आहे.

"अनेकदा आकडेवारीवरून कायदा आणि सुव्यवस्थेची चर्चा केली जाते. पण मोठ्या शहरांच्या तुलनेत मुंबई ही वर्षानुवर्षे महिलांना सुरक्षित वाटते. पण महिला किंवा मुले बेपत्ता झाल्यास 72 तासांत तक्रार नोंदवावी लागते. त्यानंतर त्यांना किडनॅप केले की पळवून नेले या दृष्टीने तपास करावा लागतो.

पण देशभरातील एकूण आकडेवारी पाहता, महाराष्ट्र हा महिला अपहरण किंवा बेपत्ता होण्याचा प्रकरणात १२ व्या क्रमांकावर आहे. बाल लैंगिक गुन्ह्यात महाराष्ट्र १७ व्या क्रमांकावर आहे. पण महिलांच्या गायब होण्याला वेगवेगळी कारणे आहेत. यात काही हरवलेल्या असतात, काही महिला स्वत:हून पळून गेलेल्या असतात. त्यातही १८ वर्षांच्या खालील आणि १८ वर्षांच्या वरील अशा दोन कॅटेगिरी आहेत.

फडणवीस म्हणाले, यात आतापर्यंत परत आलेल्या, सोडवलेल्या अशांची संख्या आहे ८७ टक्के. ही आकडेवारीही वाढत जाते. २०२२ मध्ये हेच प्रमाण ८० टक्के इतके आहे.तीही ९० टक्क्यांच्या वर जाते. जानेवारी ते मे २०२३ या काळात ज्या घटना घडल्या त्या उघडकीस आल्या आहेत. त्यातील ६३ टक्के महिलांना परत आणलं आहे. हाही आकडा ९० टक्क्यांपर्यंत जाणार. पण देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बेपत्ता महिला- बालकांना परत आणण्याची सरासरी ही १० टक्क्यांनी जास्त आहे.

विशेष म्हणजे बालकांच्या बाबतीत महाराष्ट्राची कामगिरी अतिशय चांगली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी २०१५ पासून सुरू केलेल्या ऑपरेशन मुस्कान च्या माध्यमातून जवळपास ३४ हजार बालकांना आपण त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्यात यशस्वी झालो आहोत. २०२१ मध्ये ही आकडेवारी ९६ टक्के इतकी होती, २०२२ ची ९१ टक्क्यांवर पोहचली आहे. २०२३ ची आतापर्यंची ७१ टक्क्यांवर पोहचल्याचेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

तसेच, 'ऑपरेशन मु्स्कान'च्या माध्यमातून महाराष्ट्र पोलिसांनी जी कामगिरी केली आहे, त्यासंदर्भात केंद्र सरकारने पार्लमेंटमध्येही आपला उल्लेख केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे, असं सांगत त्यांनी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदनही केलं. महाराष्ट्रात महिला, बालकं सुरक्षित नाहीत याच्या अॅनालिसिस मध्ये जर आपण गेलो, तर अनेकदा महिला घरातून निघून गेलेल्या असतात, घरचीही काही कारणं असतात, त्याची तक्रार होते पोलीस त्यांना घरी आणतात. अशी अनेक कारण आहे. असंही फडणवीसांनी नमुद केलं आहे.

Edited By -Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT