Excerpt of smart electricity meter on electricity consumer complaints
Excerpt of smart electricity meter on electricity consumer complaints 
मुंबई

कोळसा टंचाईने हैराण : राज्यातील 13 वीजनिर्मिती केंद्रे बंद, भारनियमनाचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी चिंतेची बातमी असून राज्यात कोळशाचा पुरवठा पूर्ववत झाला नाही तर राज्यात भारनियमन लागू करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. त्यामुळे ग्राहकांनी आतापासूनच वीजबचत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या काळात पुन्हा भारनियमन सुरू होते की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे.

चीन, ब्रिटन यासह जगातील अन्य देशांत वीजटंचाई जाणवत आहे. कोळसा आणि इतर इंधनाची टंचाई हे त्यामागे कारण आहे. भारतातही कोळशाची टंचाई असल्याने वीजक्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. केंद्र सरकार टंचाई नसल्याचे सांगत असले तरी महाराष्ट्रात कोळशाअभावी 13 वीजनिर्मिती केंद्रे बंद पडली आहे. परिणामी राज्य अंधारात बुडण्याची भीती व्यक्त होत आहे.

राज्य सरकारने आता याचे खापर केंद्र सरकारवर फोडले असून केंद्राने पुरेशा प्रमाणात कोळशाचा पुरवठा केला नाही,तर राज्यात नाईलाजाने भाररनियमन करावे लागेल, असा इशारा महावितरणने दिला आहे.

कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. राज्यात (मुंबई वगळून) काल, शनिवारी १७२८९ मेगावॅट विजेची मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. तर, गेल्या २४ तासांमध्ये राज्याच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे आज विजेच्या मागणीत घट झाली. आज, रविवारी सकाळी साडेअकरा वाजता राज्यात १८,२०० मेगावॅट तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात १५ हजार ८०० मेगावॅट विजेची मागणी होती.

कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी वीजग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. त्यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी २१० मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे. विजेची मागणी व उपलब्धतेत सध्या ३३३० मेगावॅटची तूट आहे,ती भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरु आहे.पण,देशभरातच विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होऊन ते १४ रुपये प्रती युनीटवर गेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT