Supriya Sule and Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Supriya Sule : ''सत्ताधारी आमदारांचीही घरे सुरक्षित नसतील तर...'', सुप्रिया सुळेंकडून पुन्हा एकदा फडणवीस लक्ष्य!

Mayur Ratnaparkhe

Sule and Fadnavis News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. या वेळी त्यांनी आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांना लक्ष्य केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण काल त्यांनी थांबवले. सरकारकडून मंत्र्यांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवण्यात आल्यानंतर, काही अटींसह मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केले आणि सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली.

तत्पूर्वी जरांगेंचे उपोषण सुरू असताना बीडमध्ये हिंसाचार उफाळला होता. आंदोलक आक्रम झाले होते. यातूनच त्यांनी जाळपोळ, दगडफेक आदी कृत्ये केली. त्यादरम्यान अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावली, वाहनांचे नुकसान केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा निशाणा साधत, मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? -

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''राज्य सरकारला पाठिंबा देणारे आमदार स्वतः सांगत आहेत, त्यांच्या घरावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता. हल्लेखोरांकडे हत्यारे, पेट्रोलबॉम्ब, दगड आदी होते. या संपूर्ण घटनाक्रमात पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असेही त्यांचे म्हणणे आहे. ते गृहखाते आणि गृहमंत्री महोदयांचे अपयश अधोरेखित करीत आहेत.''

याचबरोबर ''जर या राज्यात सत्ताधारी आमदारांचीही घरे सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आहे. राज्याचे गृहमंत्री सपशेल अपयशी ठरलेत आणि त्यांना गृहखाते झेपत नाही, याचा हा आणखी मोठा पुरावा आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी मोकळे करावे,'' असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

हा एक पूर्वनियोजित कट होता -

हल्ल्याच्या घटनेबाबत प्रकाश सोळुंके म्हणाले, ''मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी आणि माझे कुटुंबीय त्यांच्या आंदोलनात सहभागी आहोत, पण 30 ऑक्टोबरला माझ्या घरावर हल्ला करण्यात आला. 200 ते 300 जण तयारीनेच आले होते. त्या समाजकंटकांनी दगडफेक करत माझे घर जाळले. या समाजकंटकांकडे पेट्रोलबॉम्ब आणि मोठे दगड होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून आले होते. हा एक पूर्वनियोजित कट होता"

"जाळपोळीची घटना घडली, हे गृहविभागाचे अपयश आहे. जेव्हा घटना घडली, तेव्हा पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. माझ्यासमोर एक जण घरावर दगड फेकत होता. मात्र, पोलिस फक्त उभे होते, त्यांनी काही केले नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याबरोबर माझे बोलणे झाले असून, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली हे मी त्यांना सांगितले आहे", असे प्रकाश सोळंके म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT