Ramdas Kadam | Balasaheb Thackeray
Ramdas Kadam | Balasaheb Thackeray Sarkarnama
मुंबई

`कदम खानदानाला राजकारणातून संपवायचं हे `मातोश्री`वर ठरलं होतं!`

सरकारनामा ब्युुरो

मुंबई : कदम खानदानाला राजकारणातून संपवायचं हे मातोश्रीवर ठरलं, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी केला. तसेच आदित्य ठाकरे हे आमदारांना गद्दार म्हणत आहे. त्यांनी बोलताना थोड भान ठेवलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. शिवसेनेने आम्हाला खूप दिलं असं आता सांगितलं जातं. पण सेनेसाठी आम्ही किती खस्ता खाल्ल्या हे कोणी विचारत नाही. मनिषा कायंदे, प्रियांका चतुर्वेदी यांना सेनेने सहज पदे दिली. त्यांनी पक्षासाठी काय केले होते, असा सवाल त्यांनी विचारला.

शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देत अनेक गौप्यस्फोट केले. कदम खानदानाला राजकारणातून संपवायचं हे मातोश्रीवर ठरलं, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यासाठी अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी बैठकही झाली होती. परब यांच्याविरोधात मी कधीच काही केले नाही. तरी त्यांनी सातत्याने मला व माझ्या मुलांना लक्ष्य केले. माझ्या मुलाला निवडणुकीत पराभूत करण्याचे प्लॅनिंग झाले. मला मिडियाशी बोलण्यासाठी गेली तीन वर्षे बंदी होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधाननंतर मी मातोश्रीवर आतापर्यंत गेलेलो नाही, असेही कदम यांनी सांगितले.

आता तसेच आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत आहे. त्यांनी बोलताना थोड भान ठेवलं पाहिजे. त्यांचे वय 32 वर्ष आहे, माझे पक्षासाठी योगदान 52 वर्ष आहे. त्यांना अशी वक्तव्य शोभत नाहीत. त्यांनी जे बोलतो ते करुन दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.

कदम म्हणाले, हे आमदारांचे बंड नाही हा उठाव आहे. मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो, तसेच आमदारांचे देखील अभिनंदन करतो. पुढची अडीच वर्ष अशीच गेली असती तर शिवसेनेचे 10 आमदार देखील निवडून आले नसते. राष्ट्रवादी काॅंग्रेसने शंभर जागांवर आपले आमदार निवडून आणण्याचा निर्धार केला होता. त्याचा फटका शिवसेनेला बसला असता, असेही ते म्हणाले. जोपर्यंत न्यायालयाचा अधिकृत निकाल लागत नाही तोपर्यंत पक्ष कोणाचा हे मी बोलणार नाही. वाईट वाटलं म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी निघालं. आता माझ्या डोळ्यात पाणी येणार नाही, आता त्रास देणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढणार, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

ते पुढे म्हणाले, तुम्ही किती लोकांची हकालपट्टी करणार, मी 52 वर्षे पक्षासाठी दिले. माझी हकालपट्टी केली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना आहे. 25 वर्षानंतर मराठी माणूस किती शिल्लक आहे, याचा विचार करायला हवा. समजनेवालो को इशारा काफी होता है... असेही त्यांनी नमुद केले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना शेवटच्या क्षणापर्यंत मी आणि बाळा नांदगावकर त्यांच्यासोबत एकत्र होतो. ते माझे जवळचे मित्र आहेत.

राज ठाकरे गेले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले, असेही रामदास कदम यांनी सांगितले. राज ठाकरेंना परत शिवसेनेत आणण्यासाठी मी प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. यापुढे आम्ही बाळासाहेबांचा विचार आणि भगवा झेंडा सोडून दुसरं काही करणार नाही. पक्षाशी बेईमानी करणार नाही. 1995 ला बाळासाहेबांची इच्छा असूनही मला मंत्रीपद मिळालं नाही, कारण राज ठाकरेंच्या जवळ होतो, अशी खंत कदम यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT