NCP News : ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित १२ हजार २०० कोटी रुपयांच्या अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाविरोधात राजकीय मोर्चेबांधणी मजबूत होताना दिसत आहे. भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटही मैदानात उतरले असून प्रकल्पाच्या फेरविचाराची मागणी केली आहे.
यासंदर्भात नगरसेवक नजीब मुल्ला यांनी येत्या महासभेत लक्षवेधी घेण्याचे निवेदन महापौरांना दिले आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्या या लक्षवेधीला सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मनोज शिंदे अनुमोदक असल्यामुळे या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला सुरुवातीपासूनच मार्गिका, विस्थापन आणि खर्चाच्या मुद्द्यावरून आक्षेप घेतले जात आहेत. प्रकल्पाची अंदाजित किंमत १२ हजार २०० कोटी रुपये असून, २९ किलोमीटरच्या मार्गिकेत २२ स्थानके प्रस्तावित आहेत. केंद्र सरकारने २०२४ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली होती.
मात्र, या मंजुरीनंतरही प्रकल्पाबाबतचे प्रश्न कमी झालेले नाहीत. प्रस्तावित मार्गिकेमुळे काही भागांतील व्यावसायिक, औद्योगिक आणि निवासी बांधकामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर विस्थापन आणि पुनर्वसनाचा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नागरिक आणि पर्यावरणवादी संस्थांकडूनही प्रकल्पाच्या मार्गिकेवर आक्षेप घेतले जात आहेत.
भाजपकडून होणारी टीका, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची भूमिका आणि ‘वेकअप ठाणेकर’च्या माध्यमातून दिवसेंदिवस विरोध वाढत आहे. मध्यंतरी शिवसेना शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही मार्गिकेबाबत आक्षेप घेतला होता. त्यानंतर अंतर्गत मेट्रोच्या मार्गीका बदलण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आता या विरोधी भूमिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटही सहभागी झाले आहे.
नजीब मुल्ला यांनी आपल्या लक्षवेधी सूचनेत म्हटले आहे की, पूर्वी तीन ते चार हजार कोटी रुपयांच्या अंदाजात असलेला प्रकल्प आता सुमारे १२ हजार २०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एवढ्या मोठ्या आर्थिक भाराच्या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये असलेली नाराजी आणि प्रस्तावित मार्गिकेमुळे होणारे विस्थापन यावर व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे. महापालिकेच्या निधीवर हा भार पडू नये, तसेच उपलब्ध निधीचा उपयोग हॉरिझाँटल मेट्रो, व्हर्टिकल टीएमटी आणि अन्य वाहतूक उपायांसाठी अधिक परिणामकारकपणे करता येईल का, याचाही विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ, अधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांचा समावेश असलेली उपसमिती स्थापन करून प्रकल्पाचा सर्वंकष अभ्यास करावा, अशी मागणी नजीब मुल्ला यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकल्पाचा फेरविचार केला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार या समितीला 40 ते 60 दिवसांचा वेळ देऊन समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत महामेट्रोला दिलेल्या मंजुरीनुसार सुरू असलेली पुढील कामे थांबवावीत, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.
अंतर्गत मेट्रोला केंद्र आणि राज्याची मंजुरी मिळालेली असून महामेट्रोकडून प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. मेट्रोसारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पाला विरोध करण्याऐवजी त्याचा मार्ग, खर्च, विस्थापन आणि भविष्यातील वाहतूक गरजा यांचा पुनर्विचार करून निर्णय घ्यावा, अशी भूमिका मुल्ला यांनी घेतली आहे. नव्या पायाभूत सुविधा आणि बदलती वाहतूक व्यवस्था लक्षात घेऊन ठाणे शहरासाठी अधिक उपयुक्त पर्याय निश्चित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी या लक्षवेधीला अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्यामुळे आता या प्रकल्पाची पुढील वाटचाल कशी राहणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.