Milinde Narvekar
Milinde Narvekar sarkarnama
मुंबई

आमदार तर गेलेच पण उद्धव ठाकरे यांची `सावली`ही गायब!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : बंडखोर आमदारांना पटवून मुंबईत आणणण्यासाठी सुरतेत दाखल होऊन तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात समेट घडविण्याची धडपड करणारे ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) चार दिवसांत दिसेनासे झाले आहेत. `मातोश्री`, `वर्षा` आणि `सह्याद्री`वरून ठाकरे सरकारचे पडद्यामागून सूत्रे हलविणारे नावर्केर हे शिवसेनेवर संकट असताना पुढे येत नसल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले आहे.

एरवी, ठाकरेंच्या मागेपुढे सावलीसारखे दिसणारे नार्वेकर सध्या कुठे आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, त्यानंतर सेना भवनावर बैठका घेतल्या. तेथेही नार्वेकर दिसले नाहीत. राजन साळवी यांनी आज विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला तिकडेही ते फिरकले नाहीत. अन्यथा शिवसेना भवन, विधानभवन, मंत्रालय अशा सर्व ठिकाणी नार्वेकर शिवसेनेच्या महत्वाच्या घडामोडीत दिसायचे.

त्यात योगायोग म्हणजे, 'धर्मवीर' चित्रपटात दाखविलेले काही नेते ठाकरेंपासून लांब झाल्याचे दिसत आहेत. त्यातील शिंदे, माजी मंत्री दादा भुसे यांनी तर बंडच केले. तर या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे हे गणेशोत्सवात नार्वेकरांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला गेल्याचे दाखविण्यात येत आहे. तर याच चित्रपटातील दिसलेले खासदार राजन विचारे हेही नाराज खासदारांच्या यादीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या चित्रपटातील सगळेच प्रमुख चेहरे 'मातोश्री'पासून लांब होत आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तब्बल २८-२९ वर्षे सावलीसारखे वावरणारे नार्वेकर हे ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जाते. ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सत्ता वर्तुळात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या `वर्षा` आणि `सहयाद्री` अथितिगृहात त्यांचा मोठा दबदबा होता. ठाकरेंवर टीका करायची असेल तर ती नार्वेकरांवर केली जायची आणि त्या आडून ठाकरेंना बोल लावण्यात येत होते.

विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निकालाआधी सुरतला धूम ठोकलेल्या पुन्हा परत आणण्यासाठी ठाकरे यांनी नार्वेकरांनाच पाठवले होते. शिवसेनेसोबत चर्चा नाही, असे ठरवून गेलेल्या शिंदे यांनी सुरतमध्ये नार्वेकरांसोबत चर्चा केली; त्यापलीकडे त्यांच्याच मोबाईलवरून ठाकरेंसोबतही बोलले. अर्थात, किमान फोनवरून चर्चा करण्यास नार्वेकरांनी शिंदेंना भाग पाडले. यामागे नार्वेकर-शिंदे यांच्यातील मैत्रीही कारणीभूत आहे. गंमत म्हणजे, या दौऱ्यात नार्वेकरांसोबत असलेल्या आमदार रवींद्र फाटक हे दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच शिंदे यांच्या गोटात हजर झाले. त्यानंतर ठाकरेंकडे आलेले काही मंत्री, आमदारही शिंदेकडे गेले.

या साऱ्या गोंधळात नार्वेकर हे ठाकरेंसोबत `मातोश्री`वर राहिले. पण ते फारसे कोणाच्या नजरेपुढे आले नाहीत. त्यानंतर ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची राजीनामा दिल्यानंतर तो घेऊन नार्वेकर हे राज्यपालांकडे गेल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेना भवनातील ठाकरेंच्या एका बैठकीला नार्वेकर आले. ते तिथे अर्धा-पाऊणतासच असल्याचे सांगण्यात आले. तेव्हाच, नार्वेकर हे शिंदे सरकारमध्ये मंत्री होणार असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीतून झळकले. परंतु, तो खोडसाळपणा असल्याचे नार्वेकरांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले गेले.

बंडखोर आमदार आपल्या भूमिकांवर राहिल्याने ठाकरे सरकार गडगडणार असल्याचे गेल्याचे (२२ जून) स्पष्ट झाले. त्याचवेळी 'मी उद्धवसाहेबांचा आनंद दिघे आहे' या आशयाचे नार्वेकरांचे २०२० मधील ट्विट व्हायरल झाले होते. त्यामुळे नार्वेकरांच्या मनातील शिवसेना, ठाकरे निष्ठेची चर्चा रंगली होती. त्यात ते आता गायब असल्याने ते ही चर्चा थांबण्याचे नाव नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT