Mumbai Congress  Sarkarnama
मुंबई

Mumbai Congress: अमीन पटेल, अस्लम शेख काँग्रेस सोडण्याच्या तयारीत!

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Mumbai: काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील बाबा सिद्दीकी (माजी राज्यमंत्री) राज्यसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्यातील काँग्रेसला बसलेला हा दुसरा फटका असेल. याआधी माजी खासदार आणि मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिंदे शिवसेनेचे धनुष्य हाती घेतले होते. हे कमी म्हणून की काय लवकरच आणखी काही आमदार आणि माजी मंत्री सत्ताधारी भाजपच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.

आमदार अमीन पटेल आणि अस्लम शेख हे काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. तर माजी मुख्यमंत्री आणि नेते सुशीलकुमार शिंदे तसेच अशोक चव्हाण यांची नाराजी कायम असून ते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गडबड करण्याची भीती आहे.

झिशान यांच्यासह मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल तसेच मालाड पश्चिमचे आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख हे पण काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. अस्लम मागच्या निवडणुकीतच काँग्रेस सोडून जाणार होते. पण, शेवटच्या घटकेला त्यांनी विचार बदलला. त्यांचे नशीब म्हणा उध्दव ठाकरे यांचे आघाडी सरकार आले आणि त्यांना मंत्रिपदाची लॉटरी सुद्धा लागली. पण इतकं मिळूनही त्यांना पुन्हा एकदा काँग्रेस सोडावीशी वाटत आहे. झिशान यांच्याप्रमाणे अस्लम सुद्धा चौकशीच्या कचाट्यात अडकले आहेत.

सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे अजूनही काँग्रेसवर नाराज असल्याचे कळते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी शिंदे आणि चव्हाण यांच्यावर नाराज असल्याचे कळते. अनुभवी नेते असूनही राज्यात पक्षाच्या वाढीसाठी काहीच हालचाल करत नसल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठी या दोघांना आता बाजूला करायच्या विचारात आहे.

वांद्रे मतदारसंघात शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव करत झिशान सिद्दीकी विजयी झाले होते. मातोश्री परिसरातील हा मतदारसंघ शिवसेनेचा गड असल्याने त्याला सुरुंग लागल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना हा मोठा धक्का होता. मात्र शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने अपक्ष उभ्या राहिलेल्या तृप्ती सावंत यांनी मोठ्या प्रमाणावर मते आपल्या बाजूने वळवल्यामुळे उध्दव यांच्या हातातील जागा गेली. याचे शल्य अजूनही मातोश्रीला आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत जागा खेचून आणायची असा मातोश्रीचा निर्धार आहे. या जागेसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत उध्दव यांचे अत्यंत विश्वासू नेते अनिल परब यांना उमेदवारी देण्यात येणार आहे आणि तसे झाल्यास महाविकास आघाडीत असूनही आपल्याला बाजूला जावे लागेल, अशी भीती झिशान यांना आहे.

झिशान यांच्यावर एसआरएमधील भ्रष्टाचाराचे आरोप असून चौकशीचे शुक्लकाष्ठ बाजूला सारायचे असेल तर सत्ताधारी गटात जाण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय दिसत नाही. दुसऱ्या बाजूला वांद्रे नाही तर किमान वर्सोवा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी झिशान प्रयत्न करत आहेत. सध्या या मतदारसंघात विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या भारती लव्हेकर या आमदार आहेत. मात्र त्यांना भाजपने कमळावर निवडणूक लढवायला लावली होती. विशेष म्हणजे झिशान यांचे वडील बाबा सिद्दीकी महत्वाकांक्षी असून आपल्या मुलाला राजकारणात उभे करण्यासाठी ते आपली सारी ताकद पणाला लावतील. भाजप मध्ये गेल्यास त्यांच्या मागे असलेला मुस्लिम समाज नाराज होईल, या भीतीपोटी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT