sandip deshpande
sandip deshpande  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : ''...नाहीतर रस्त्यावर पवार…पवार ओरडत फिरायची पाळी आपल्यावर येईल!''; मनसेचं राऊतांना पत्र

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला मारण्याची सुपारी दिलीय असा आरोप राऊतांनी केला आहे. त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. याचदरम्यान, आता मनसे नेत्यानं राऊतांना पत्र लिहित जोरदार कानपिचक्या दिल्या आहेत.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतां(Sanjay Raut) ना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे देशपांडे यांनी राऊतांना चांगलंच फटकारलं आहे. या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच सोशल मीडियावरही हे पत्र चांगलंच व्हायरल झालं आहे.

या पत्रात देशपांडे यांनी राऊतांना आपण रोज जी पत्रकार परिषद घेता, त्याऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळूहळू आठवड्यातून एकदा घ्या असं करता येईल का? ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या १० ते १५ मिनिटे पूर्वी योगा करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल असा उपरोधिक टोलाही लगावला आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी संजय राऊतांना तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटी हे पत्र लिहित असल्याचं म्हटलं आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चीडचीड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात.

आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढळू लागतो. त्याची चीडचीड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. तुम्ही कितीही नाकारलं तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी असा सल्लाही राऊतांना दिला आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना पवारसाहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना (Shivsena) हातून गेली, ही सल मनाला लावून घेतली आहे. ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही तेवढेच जबाबदार आहेत, हे लक्षात घ्या, नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर ‘पवार…पवार’ असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

...म्हणून काळजीपोटी हा पत्रप्रपंच!

कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्‍तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच! पटलं तर घ्या, नाही पटलं तर चु%^* आहे असं म्हणून विसरून जा असंही देशपांडे राऊतांना पत्रात म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT