Raju Patil Sarkarnama
मुंबई

Raju Patil News : 'ऊंची छलाँग लगाने के लिए चिता भी...' ; राजू पाटलांची 'पोस्ट' व्हायरल!

Mayur Ratnaparkhe

MNS Gudipadwa Melava : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यामधून राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची मनसेची भूमिका जाहीर केली. फक्त नरेंद्र मोदींसाठी म्हणून मी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करत असल्याची राज ठाकरेंनी घोषणा केली.

राज ठाकरेंनी(Raj Thackeray) घेतलेल्या निर्णयाचे पडसाद स्वाभाविकपणे महाराष्ट्रभर उमटू लागले. राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया आल्या आणि अद्यापही येत आहेत. राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळए तर्कवितर्क मांडले जात आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपल्या नेत्याच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार राजू पाटील(Raju Patil) यांनी राज ठाकरेंचा निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, मनसेबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांनाही प्रत्युत्तर दिलं आहे. याचबरोबर राज ठाकरेंनी विधानसभेच्या तयारी लागा असा आदेश दिल्याचे सांगून, राजू पाटील यांनी मनसेची आगामी भूमिका कशी असणार याचेही संकेत दिले आहेत.

राजू पाटील यांनी नेमकं काय म्हटलं आहे? -

'कालच्या साहेबांच्या भाषणानंतर बऱ्यापैकी शंका कुशंकांचं मळभ दूर झालं असावं. खरंतर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे अंदाज बांधणाऱ्या लोकांनी कल्पनांचे इमले इतके भयानक आणि अतर्क्य बांधले होते की विचारता सोय नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाची धुरा वाहताना भूमिका मांडणं हे सोशल मीडियावर कुणाच्या तरी wall वर जाऊन आपली मतं मांडण्याइतकं (टर उडवण्याइतकं) सोप्पं नसतं. भूमिका ठरायला वेळ लागतो, विचारविनिमय करावा लागतो, भविष्यातील वाटचालींचा अंदाज घ्यावा लागतो.'

'महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थितीबद्दल अत्यंत स्पष्ट शब्दांत सन्माननीय राजसाहेबांच्या शैलीत खरपूस समाचार घेतला गेला आहेच. परंतु आगामी निवडणुका ह्या अखंड हिंदुस्थानच्या भविष्याची वाट ठरवणाऱ्या निवडणुका आहेत.

विशेषतः आपला देश विकसनशील ते विकसित अशा संक्रमण अवस्थेतून जात असताना देशात नेतृत्व बदल होणे परवडण्यासारखं नाहीय. (आणि समजा जरी धोका पत्करायचा म्हटला तरी पर्याय कोण आहे ?) ह्यांना पराभूत करून जिंकून कोणाला देणार आहोत ? आमच्या आगरी भाषेत म्हण आहे ‘खायाची मोत, पुन मिशीला तेल’ अशी मोदींच्या विरोधकांची अवस्था. ह्यांच्या नेतृत्वात आपल्या देशाचं काय भलं होणार ? शिवाय मोदींच्या कणखर निर्णयांनी देशाची प्रतिमा उजळली आहे, हे मी जेव्हा परदेशात गेलो होतो तेव्हा स्वतः अनुभवलं आहे.'

'खिळखिळी अर्थव्यवस्था ते पहिल्या पाचात जाऊ शकणारी अर्थव्यवस्था, 370 कलम रद्द करणे आणि माझ्या वैयक्तिक इच्छेतलं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे राम मंदिराचे निर्माण, देशातील डिजिटल क्रांती अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्याच पाहिजेत. सन्माननीय राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे वाईट आहे त्यावर कोरडे ओढाच, पण चांगलं आहे त्याचं कौतुक करण्याची सर्वच राजकारण्यांनी सवय घ्यायला हवी.'

तसेच,'महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताची आणि अस्मितेची बाजू उंचावणारा पक्ष आहेच पण सवाल जेव्हा देशाचा येतो तेव्हा प्राथमिकता हिंदुस्थानच असणार ना. शिवाय आम्हा सर्व मनसैनिकांच्या आवडत्या शैलीत बोट उंचावून साहेबांनी सांगितलंच आहे...विधानसभेच्या तयारीला लागा. आणि शेवटचं पण महत्वाचं सांगतो. ‘ऊंची छलाँग लगाने के लिये चिता भी दो कदम पीछे आता है..' अशा शब्दांमध्ये आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT