Sanjay Raut News
Sanjay Raut News  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : काश्मीरमधून 370 कलम हटवल्यावर काय बदलले ? ; राऊतांचा मोदी सरकारला सवाल

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut News : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या 'रोखठोक' सदरातून जम्मू-काश्मीर येथील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. मोदी सरकारवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

"कलम 370 हटवल्यानंतरही कश्मिरी पंडितांची घरवापसी होऊ शकलेली नाही. आजही कश्मीर एक बंदिवान नंदनवन आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत व बेरोजगारीमुळे त्यांच्यात वैफल्य आहे. 370 कलम हटवल्यावर बाहेरचे उद्योग तेथे येतील हा भ्रम खोटा ठरला.

पण एका विशिष्ट प्रांताचे लोक जम्मूत आले व त्यांनी व्यापार हाती घेतला हे स्पष्ट आहे,370 कलम हटवल्यावर जम्मू-कश्मीरमध्ये काय बदलले? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. कश्मीर खोऱ्यातील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे व बंदुकांच्या जोरावर तात्पुरती शांतता नांदते आहे" असे राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

"जम्मू-काश्मिरातील भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. यावेळी अब्दुल्ला म्हणाले, ‘आदिशंकराचार्यांनंतर राहुल गांधी ही दुसरी व्यक्ती आहे, जी चालत कश्मीरला पोहोचली आहे.’ शंकराचार्यांच्या काळात तर रस्तेही नव्हते. आज रस्ता आहे, पण त्यावर बर्फाचे डोंगर झाले. ते पार करून राहुल गांधी कश्मीरात पोहोचतील व तिरंगा फडकवतील तेव्हा देशाच्या राजकारणातले नवे पर्व सुरू झाले असेल," असे राऊत यांनी सांगितले आहे.

संजय राऊत म्हणतात..

त्यांच्यावर उपासमारीची वेळ

‘अतिरेकी ओळखपत्र पाहून गोळय़ा घालतात. शाळा, सरकारी कार्यालयांत घुसून पंडितांच्या हत्या करतात. आम्हाला कसलेच संरक्षण नाही. तेव्हा आमच्या बदल्या जम्मूत करा,’ असे कश्मिरी पंडित सांगतात. सरकार त्यांचे ऐकायला तयार नाही. कश्मिरी पंडितांनी खोऱ्यात जाऊन नोकरीवर रुजू व्हावे असे सरकारचे फर्मान आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार सरकारने बंद केल्याने आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

‘शिवसेनाने हमारे लिए दिल के दरवाजे खोले.’

मी जम्मूत त्यांना भेटण्यासाठी गेलो. तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या जयजयकाराच्या घोषणा तेथे गरजल्या. त्या आंदोलनात निवेदन करणारे अनेक तरुण मराठी बोलत होते. तुम्ही मराठी कसे बोलता? असे मी विचारले तेव्हा ते तरुण म्हणाले, ‘ही सर्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची कृपा. त्यांनी कश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे उघडले. आमच्या मुलांना उच्च शिक्षणात राखीव जागा ठेवल्याने आम्ही मुंबई-पुण्यात येऊन शिकलो. डॉक्टर, इंजिनीयर्स झालो. बाळासाहेब आणि शिवसेनेने आमच्यासाठी जे केले ते कधीच विसरता येणार नाही!’ असे भारावलेले उद्गार त्यांनी काढले. ‘शिवसेनाने हमारे लिए दिल के दरवाजे खोले.’

‘टार्गेट कीलिंग’ पुन्हा सुरू

ज्या कश्मिरी पंडितांच्या हत्येचा व घरवापसीचा ‘प्रपोगंडा’ भाजपने राजकारणासाठी केला, ते कश्मिरी पंडित आजही भीतीच्याच छायेखाली जगत आहेत. मी जम्मूत उतरताच मला सांगण्यात आले, कश्मिरी पंडित मोठ्या संख्येने जम्मूत गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर बसली आहेत. आंदोलन करीत आहेत. हे सर्व सरकारी कर्मचारी आहेत व कश्मीर खोऱ्यात त्यांच्या नेमणुका आहेत. ‘टार्गेट कीलिंग’ पुन्हा सुरू झाल्याने हे सर्व कश्मिरी पंडित पुन्हा जम्मूत आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT