Sanjay Raut
Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : राहुल गांधींना विचारलेला प्रश्न शेतकऱ्यांना का विचारत नाही ; राऊतांचा सवाल

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut : हिंदुत्व, महागाई यावरुन सामनाच्या 'रोखठोक'मधून खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी शिंदे गट, भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत. "मावळत्या वर्षातून भूक आणि गरिबीचा हा प्रवाह नव्या वर्षात तरी कमी व्हावा. तो कमी व्हावा म्हणून राज्यकर्ते आणि विरोधकांत एकमत व्हायला हवे. विरोधी पक्ष देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठवू शकतो हे सत्ताधाऱयांनी मान्य करायला हवे," असे 'रोखठोक'मध्ये म्हटलं आहे. (Sanjay Raut news update)

दिल्लीची महापालिका व हिमाचल राज्य भाजपने गमावले. त्यामुळे स्वतःच्याच घरात म्हणजे गुजरातमध्ये विजय मिळवला यास महत्त्व नाही. तरीही देश एका भीतीच्या सावटाखाली आहे. कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे, सरकारी यंत्रणा आपले बोलणे ऐकते आहे असे प्रत्येक प्रमुख माणसाला वाटते. हे निरोगी लोकशाहीचे लक्षण नाही. नव्या वर्षात तरी देश व जनता मोकळा श्वास घेईल. आपला देश मनाने जोडला जाईल ही आशा बाळगू या, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

आजच्या 'रोखठोक'मध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. "मोदी म्हणाले ते खरेच आहे. गुरू गोविंद सिंग यांच्या सुपुत्रांनी बलिदान दिले. त्यांची मुंडकीच उडविण्यात आली. आज लोकशाही, स्वातंत्र्य यांची मुंडकी उडवूनच राज्य चालले आहे. नव्या वर्षात तरी देशातील लोकशाही व स्वातंत्र्याची कवचकुंडले मजबूत होवोत. कारण संकुचित मानसिकतेची सर्व लक्षणे सध्याच्या राज्यकर्त्यांत दिसत आहेत," असा टोला राऊतांनी लगावला आहे.

'रोखठोक'मध्ये संजय राऊत म्हणतात..

कोणतेही वेगळेपण नसलेले 2022 हे वर्ष फार खळखळाट न करता मावळले आहे. मावळत्या 2022 सालाने महाराष्ट्राला व देशाला फसवणुकीशिवाय दुसरे काहीच दिले नाही. ही फसवणूक सत्ताधाऱ्यांकडून झाली, पण त्याच वेळी हाती सत्य आणि निर्भयतेची मशाल घेऊन श्री. राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रा’ घेऊन कन्याकुमारीतून निघाले.

ते मावळत्या वर्षात दिल्लीत थडकले. सुमारे 2800 किलोमीटर प्रवास करून हा नेता दिल्लीत पोहोचला तेव्हाही त्याच्याबरोबर हजारो पदयात्री चालत होते व ही यात्रा बंद कशी पाडता येईल यासाठी पडद्यामागे दिल्लीतच कारस्थाने सुरू होती. मावळत्या वर्षाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वास नवे तेज आणि वलय निर्माण करून दिले.

कडाक्याच्या थंडीत फक्त एका टी शर्टवर राहुल गांधी चालत असतात. ‘‘राहुल गांधींना थंडी लागत नाही काय?’’ या प्रश्नावर या नेत्याने दिलेले उत्तर हृदयस्पर्शी आहे, ‘‘हा प्रश्न ते मला विचारतात, पण हाच प्रश्न ते देशातील शेतकऱ्यांना का नाही विचारत? देशाच्या कष्टकरी, मजुरांना, गरीब मुलांना का नाही विचारत? 2800 किलोमीटर चालतोय यात काय मोठे? संपूर्ण देश चालतोय, मजूर चालतोय, शेतकरी जीवनभर हजारो किलोमीटर चालतोय. त्यांना हे प्रेसवाले प्रश्न का विचारत नाहीत?’’ राहुल गांधींचे नवे रूप मावळत्या वर्षाने दिले. ते 2023 मध्ये तसेच राहिले तर 2024 मध्ये देशात राजकीय परिवर्तन झालेले पाहता येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT