Shrikant Shinde, Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Shrikant Shinde News : मोदी-शहांच्या भेटीने बळ चढलेल्या श्रीकांत शिंदेंच्या शब्दांना धार अन् उद्धव ठाकरे घायाळ

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या भेटीनंतर मुंबईत आलेल्या खासदार श्रीकांत शिंदेंनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर 'शाब्दिक कोट्या करीत, ठाकरेंना डिवचले. 'कष्ट टाळू मुख्यमंत्री ते कष्टाळू मुख्यमंत्री असे सांगत श्रीकांत यांनी ठाकरेंचा पाणउताराच केला आहे. या ट्वीटमधून ठाकरे कष्ट टाळत होते तर मुख्यमंत्री शिंदे किती कष्टाळू आहेत, हे दाखून देण्याचा प्रयत्नही श्रीकांत यांनी केला. मोदी-शहांच्या भेटीने बळ आलेल्या श्रीकांत यांच्या ट्वीटची जोरदार चर्चा आहे.

दिल्लीतील भेटीगाठीनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्वीट केले. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ''कष्ट टाळू मुख्यमंत्री ते 'कष्टाळू' मुख्यमंत्री…महाराष्ट्राचा बदलता राजकीय प्रवास!'' अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना चिमटा काढला. ''महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री शिंदे जी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे.'' असे ट्वीट पंतप्रधानांनी केले होते. ते ट्वीट रि ट्वीट करत श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ठाकरेंना लक्ष केले.

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी शिंदे यांचा कष्टाळू मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. तोच धागा पकडत श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी शनिवारी दिल्लीत मोदी-शहांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, शिंदे यांनी भेटीनंतर माध्यमांसमोर येत ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले होते.

या भेटीनंतर शिंदे म्हणाले, ''देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी चर्चा केली.

इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले. तसेच बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत माहिती घेतली. धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे. त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेले पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावावेत, असे त्यांनी सांगितले.''

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT