Varsha Gaikwad, Bhai Jagtap Sarkarnama
मुंबई

Congress Politics : ताईंच्या 'वर्किंग' स्टाइलवर भाई नाराज

Jui Jadhav

Mumbai Congress Politics News :

मुंबई काँग्रेसमध्ये कलह असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. काँग्रेसनेत्यांमध्ये आपापसांत लढाई सुरू आहे आणि ती वारंवार चव्हाट्यावरही येत आहे. आता काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने 'सरकारनामा'शी बोलताना पक्षातील धुसफुस उघड केली आहे. काँग्रेस पक्षाला आता माझी गरज राहिली नाही, अशी खंत काँग्रेसचे आमदार आणि माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केली आहे.

'मुंबई काँग्रेसमध्ये एकी नाही'

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी त्यांच्या पक्षातील अंतर्गत धुसफुस उघड केली आहे. मुंबई काँग्रेसमध्ये आता एकी राहिली नाही आणि त्याला ठाम नेतृत्व नाही, असे विधान भाई जगताप यांनी केले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर भाई जगताप यांनी थेट निशाणा साधला आहे.

भाई जगताप यांना मुंबई Congress च्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्यानंतर वर्षा गायकवाड यांना ते पद देण्यात आले. वर्षा गायकवाड यांना हे पद दिल्यानंतर भाई नाराज असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू होत्या. मात्र उघडपणे ते बोलले नव्हते. 'सरकारनामा'शी संवाद साधताना भाई जगताप यांनी त्यांच्या मनातली खदखद बाहेर काढली.

मुंबई काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अनेक मोर्चे निघाले. अनेक सभादेखील झाल्या. पण या सगळ्यात माजी अध्यक्ष कुठेच नव्हते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखालीदेखील अनेक बैठका आणि सभा पार पडल्या. यामध्येही भाई जगताप कुठेही दिसले नाहीत. भाई जगताप यांची अनुपस्थिती काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसून येत होती. त्याचे कारण मात्र स्पष्ट होत नव्हते. काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण होत आहे आणि माझ्याच पक्षाला माझीच गरज नाही, अशी भावना भाई जगताप यांच्यात दिसून आली.

'काँग्रेसच्या सभेत आमंत्रण नाही'

काँग्रेस पक्षातर्फे अनेक सभा, मेळावे आणि बैठका घेतल्या गेल्या. मात्र या सगळ्यात भाई जगतापांना आमंत्रणही देण्यात आले नाही. मुंबई काँग्रेसला खंबीर नेतृत्व नाही. मी काँग्रेस अध्यक्ष असताना एकही नगरसेवक पक्ष सोडून गेले नाही. मात्र आता ते का जात आहेत? याचा विचार पक्षाने केला पाहिजे. पक्षातून लोक बाहेर जाण्याचा विचार करीत आहेत, ही परिस्थिती आताच का उद्भवली आहे? मी गेली कित्येक वर्षे काँग्रेसमध्ये सक्रिय आहे. पण आताची जी परिस्थिती आहे ती अत्यंत वाईट आहे. आत्मपरीक्षण करण्याची गरज पक्षाला आहे, असे विधान करीत भाई जगताप यांनी पक्षनेतृत्वावर सवाल उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'इंडिया' आघाडीला एकत्र आणणाऱ्या पक्षाचे वासे पोकळ

'इंडिया' आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेसचा आहे. 'इंडिया' आघाडीला एकत्र आणण्यासाठी देखील काँग्रेसचा मोठा हात आहे. भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्यासाठी 'इंडिया' आघाडीची स्थापना केली आहे. मात्र विरोधी पक्षांना एकत्र आणणाऱ्या काँग्रेस पक्षाचेच वासे पोकळ निघत आहेत.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम केला. काँग्रेस पक्ष त्यांना हवी ती जागा देण्यासाठी तयार नव्हता, म्हणून देवरा यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्यावर अनेक जण शिवसेनेत काँग्रेसमधून येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. भाई जगताप यांनीही आता अंतर्गत कलह असल्याचे उघड केले.

edited by sachin fulpagare

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT