Mumbai-Goa Highway  Sarkarnama
मुंबई

Mumbai-Goa Highway : मनसेच्या जागर यात्रेपूर्वीच रवींद्र चव्हाणांची मोठी घोषणा ; भाजपाचा कार्यकर्ता आहे.., कर्तव्याला चुकणार नाही…

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने आज (रविवार) जागर पदयात्रा काढली आहे. या यात्रेपूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा आज (27 ऑगस्ट) ते 28 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. (Mumbai-Goa Highway)

यासंदर्भात रवींद्र चव्हाण यांनी व्हिडीओ टि्वट केला आहे. महामार्ग हा अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. "पळस्पे ते वाकण फाटा या दरम्यान अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी जायचे असल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. २०२२ पासूनची आज पाहणीची ९ वी वेळ होती. भाजपाचा कार्यकर्ता आहे. कर्तव्याला चुकणार नाही…आणि कर्म करायला त्याहूनही नाही….” असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

"आज एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव तीन आठवड्यावर येऊन ठेपला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या विविध टप्प्यावर अहोरात्र काम सुरु असताना अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रचंड ताण विशेषतः रायगड जिल्ह्यातील रस्ते कामावर येतोय म्हणून ता. २७ ऑगस्ट २०२३ पासून २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत या महामार्गावर अवजड वाहतूकीवर बंदी आणण्याचे सरकारने ठरवले आहे. प्राधान्यक्रम मुंबई गोवा महामार्गाला दिला आहे. कारण माझा कोकणी चाकरमानी लवकरच गणेशोत्सवासाठी गावी प्रवासाला निघायचा आहे. त्या ठिकाणी जायचे असल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे," असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

मुंबई-गोवा महामार्ग गेल्या बारा वर्षापासून रखडला आहे. या महामार्गाचे अर्धवट काम आणि खड्डे यावर राज ठाकरे यांनी पनवेलच्या सभेतून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली होती. यानंतर राज ठाकरेंनी महामार्गाची पाहणी देखील केली होती. या पार्श्वभूमीवर आज मनसेची जागर यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात येत आहे. अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही पदयात्रा सुरु आहे.कोलाडमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे. यानंतर राज ठाकरे यांचे भाषण होणार आहे.

रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्ग दिरंगाईवर खुले चर्चासत्र आयोजित केले आहे. डोंबिवली पूर्वेकडील जिमखान्यात आयोजित करण्यात आलेल्या या खुल्या चर्चासत्रात कोकवासीय मुंबई-डोंबिवलीकरांनी सहभागी व्हावे , असे आवाहन करण्यात आले आहे. मनसेला प्रत्युत्तर देण्यासाठीच या चर्चेसत्राचे आयोजन करण्यात आल्याचे बोलले जाते .

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT