sanjay raut slams dharavi redevelopment project Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut: राऊतांनी दाखवली भूखंडांची यादी; अदानींना मुंबई आंदण दिली जातेय..

सरकारनामा ब्यूरो

धारावी पुर्नविकास प्रकल्पावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार यांच्याबरोबरच अदानी समुहावर निशाणा साधला आहे. संपूर्ण मुंबईच अदानींना आंदण देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं संजय राऊत यांनी 'सामना'मधील रोखठोक सदरामधून म्हटलं आहे.

शिंदे सरकारवर टीका करताना राऊतांनी भूखंडांची एक यादीच शेअर केली आहे.धारावी हा आता मुंबईसाठी संघर्षाचा मुद्दा बनला आहे. निदान धारावी मराठी माणसांच्या हातात राहिली तरच मुंबईत आपल्याला मुक्तपणे वावरता येईल. धारावी ही यापुढे मुंबईची युद्धभूमी होणार आहे, अशी भीती राऊतांनी व्यक्त केली आहे.

"धारावीकरांचे पुनर्वसन ते जेथे आहेत तेथेच व्हायला हवे. मूळ भूखंडावर ते झाले पाहिजे. धारावीची जागा 590 एकरची आहे. त्यावर एफएसआय, पुन्हा वर 1300 एकरची बिदागी. या बिदागीतील पान-सुपारी म्हणून अदानी यांना कुर्ला येथील मदर डेअरीची 21 एकर जागा, मुलुंड जकात नाक्याचा राखीव भूखंड याचा समावेश आहे. वडाळा-मुलुंडच्या मिठागराच्या जमिनीही या पान-सुपारीत आहेत.

धारावी पुनर्वसनाच्या बदल्यात अदानी व त्यांच्या बिल्डर्स टीमला महाराष्ट्र सरकार कोणते भूखंड देणार आहे यावर मुंबईकरांनी एकदा नजर टाकली पाहिजे. या यादीमधील किमान 15 भूखंडांचा धारावीशी संबंध नाही. मुंबईतील भूखंडच नव्हे तर संपूर्ण मुंबईच अदानी व त्यांच्या लोकांना कशी आंदण दिली जात आहे ते आता स्पष्ट झाले आहे. धारावी हे निमित्त आहे. संपूर्ण मुंबई महाराष्ट्राच्या हातून जात आहे," असा आरोप राऊतांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या निकालांनी दिल्लीला महाराष्ट्राचे पाणी दाखवले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काय होईल, हा प्रश्न त्यामुळे निकाली निघाला. दिल्लीत दहा वर्षे मोदी-शहांचे राज्य आहे. त्यामुळे व्यापारी स्वभावानुसार महाराष्ट्रात दलाल आणि लाचारांच्या फौजा त्यांनी उभ्या केल्या. मुंबईचे ओरबाडणे सुरूच आहे, अशी खंत राऊतांनी व्यक्त केली आहे.

"धारावीचा विकास राज्याच्या गृहनिर्माण विभागाला करता आला असता. महाराष्ट्रातल्या विकासकांना एकत्र करून ‘क्लस्टर’ पद्धतीने धारावीचे पुनर्निर्माण केले असते तर महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्रातच राहिली असती व धारावीच्या आठ लाख लोकांना 500 फुटांचे निवास मिळाले असते, पण धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई एक-दोन उद्योगपतींच्या घशात घालण्याची योजना धोकादायक आहे," असं राऊत म्हणालेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT