Mumbai Marathi Sahitya Sangh election : मुंबई मराठी साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट मतपत्रिका सादर केल्या आहेत. तर दुसरीकडे निवडणुकीत उभ्या असलेल्या काहींनी निवडणूक अधिकाऱ्यांशीच संगनमत करून 400 ते 500 मतपत्रिका चोरून ठेवल्या असून त्यात मतचोरी होत असल्याचा गंभीर आरोप डॉ. भालेराव विचार मंचातर्फे नरेंद्र पाठक यांच्यासह दिवाकर दळवी, प्रमोद पवार यांनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या मत चोरी प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला असताना, आता हा प्रकार एक नैतिक परंपरा असलेल्या मराठी साहित्य मंचापर्यंत पोचल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई (Mumbai) मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत, मुंबई मराठी साहित्य संघाकडून घेण्यात येत असलेली निवडणूक ही बेकायदा असून त्यासाठी तक्रारही केल्याचा दावा डॉ. भालेराव विचार मंचाने केला. संघाच्या निवडणुकीसाठी मिळालेल्या माहितीत निवडणुकीचा जाहीरनामा 1 हजार 315 लोकांना पाठवण्यात आला, त्यातील 344 परत आले. त्यामध्ये पत्ता सापडत नाही तर, काही मतदार हे मृत व्यक्ती, असे शेरे मारून परत आल्या आहेत. याचाच अर्थ संघाकडच्या सभासद याद्या अद्ययावत केलेल्या नाहीत, असे डॉ. भालेराव विचार मंचाने म्हटले आहे.
अनेक वेळा विनंती केल्यावर संपर्क क्रमांक दिले ते देखील चुकीचे दिले होते. तसेच कोणताही मतदार (Voter) मतदानापासून वंचित राहू नये, अशी मंचाची भूमिका असून यासाठी आवश्यकता पडली तर, आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई मराठी साहित्य संघाची 17 सप्टेंबरला पंचवार्षिक निवडणूक होत असून त्यात ऊर्जा पॅनेल आणि डॉ. भालेराव विचार मंच यांच्यात मतपत्रिकांवरून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर डॉ. भालेराव विचार मंचाच्या पत्रकार परिषदेत या निवडणूक प्रक्रियेत मतपत्रिका गहाळ झाल्या, पोस्टाने पाठवलेल्या अनेकांना मिळाल्या नाहीत. यात निवडणूक अधिकारी वकील यशोधन दिवेकर यांनी अनेक मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी याकडे कानाडोळा केल्याचा आरोप केला.
तसेच मुंबई मराठी साहित्य संघाने मतपत्रिका पाठवण्याचे कंत्राट ज्या खासगी एजन्सीला दिले, त्यांनी या मतपत्रिका प्रत्यक्षात न पाठवता केवळ बुकिंग पावत्या साहित्य संघात जमा केल्या असून यात फौजदारी स्वरूपाचा आर्थिक घोटाळा असल्याचाही आरोप या वेळी करण्यात आला. तसेच मुंबई मराठी साहित्य संघाच्या असंख्य मतदार सदस्यांसोबत, असा प्रकार झाल्याची शक्यता असल्याने याबाबत कंत्राटदार आणि निवडणूक अधिकारी यांची फौजदारी चौकशी व्हायला हवी. तसेच 600 पत्रिका गेल्या कुठे, याचीही चौकशी करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
दरम्यान, निवडणूक अधिकारी ॲड. यशोधन दिवेकर यांनी, मुंबई मराठी साहित्य संघाची निवडणूक प्रक्रिया ही नियमानुसारच सुरू आहे. काहीच्या तक्रारीनंतर निरीक्षकांची निवड झाली आहे. सर्व प्रक्रिया पारदर्शक सुरू आहे. कोणत्याही मतदारांचे मतदान त्यांच्या अधिकाराप्रमाणे व्हावे, असा प्रयत्न आहे. जर काहींना आक्षेप असतील तर, त्यांनी समोर येऊन आपल्या तक्रारी मांडायला हव्यात. शिवाय जी मुदतवाढ दिली आहे, त्यातून अधिकाधिक मतदारांना संधी मिळावी, हा उदात्त हेतू यामागे आहे; मात्र काहींनी त्याचाही चुकीचा अर्थ काढला आहे, असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.