Devendra Fadnavis On Uddhav Thackeray, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : "कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने..."; 'मविआ'च्या आंदोलनावर फडणवीसांची प्रतिक्रिया, ठाकरे-पवारांवर प्रश्नांची सरबत्ती!

Jagdish Patil

Mumbai News, 01 September : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीने आज रविवारी (1 सप्टेंबर) जोडे मारो आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मविआचे अनेक नेते उपस्थित होते.

या आंदोलन स्थळी झालेल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारावर सडकून टीका केली. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेवर माफी मागत असताना व्यासपीठावर एक शहाणा, दोन दीड शहाणे म्हणजे एक फुल दोन हाफ बसले होते. त्यातील एक हाफ हसत होता. असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

ठाकरेंच्या याच टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरुजींनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'मध्ये जे लिहिलं आहे. त्यावर तुम्ही काँग्रेसला माफी मागायला लावणार आहात का?

काँग्रेसने (Congress) मध्यप्रदेश मध्ये बुलडोझर लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला त्याच्यावर शरद पवारसाहेब (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेसाहेब का मूग गिळून गप्प बसले आहेत. कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी पुतळा हटवला त्या बद्दल ते एक शब्दही का बोलत नाहीत? असे सवाल करत फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

इतकी वर्ष काँग्रेसने आम्हाला शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. पण शिवरायांनी सुरत कधी लुटली नव्हती. मात्र, काँग्रेसने जणू महाराज त्या ठिकाणी सामान्य माणसाची लूट करायला गेल्याचा इतिहास शिकवला. त्या काँग्रेसला माफी मागायला लावणार आहात? की केवळ खुर्चीसाठी त्यांचं मिंधेपण स्वीकारणार आहात हे त्यांनी सांगितलं पाहिजे, असा सवाल करत फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

"देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात आले आणि माफी मागितली. माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने शिल्लक ठेवलं असतं? पण माफी मागतानासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. मग्रुरीने माफी आम्हाला मान्य नाही. व्यासपीठावर एक शहाणा आणि दोन दीड शहाणे म्हणजे एक फुल, दोन हाफ बसले होते. त्यातील एक हाफ हसत होता. महाराजांची तुम्ही एवढी थट्टा करता?" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच मोदींनी भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितल्याचही ठाकरे म्हणाले, "तुम्हाला काय वाटतं? मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली? पुतळा बसवताना भ्रष्टाचारा झाला म्हणून मागितली, भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरून घालण्याकरता मागितली. निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते की मोदी गॅरंटी. हीच ती मोदी गॅरंटी, हात लावीन तिथे माती होईल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT