Mumbai Police Paste absconding order on Param Bir Singh residence.
Mumbai Police Paste absconding order on Param Bir Singh residence. Sarkarnama
मुंबई

मुंबई पोलिसांनी थेट माजी प्रमुखांच्या घरावरच चिकटवला न्यायालयाचा आदेश!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) अडचणीत आले आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने परमबीरसिंह यांना दिलासा देत अटकेपासून संरक्षण दिले आहे. आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) माजी प्रमुख असलेल्या परमबीरसिंहाच्या घरावरच न्यायालयाचा आदेश चिकटवला आहे.

परमबीरसिंह यांना न्यायालयाने फरारी गुन्हेगार घोषित केले आहे. त्यानुसार मुंबई पोलीस परमबीरसिंह यांच्या निवासस्थानावर ते फरार गुन्हेगार असल्याचा न्यायालयाचा आदेश चिकटवला आहे. त्यांना हजर होण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी असेल. ते 30 दिवसांत हजर न झाल्यास त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास मुंबई पोलीस सुरवात करतील. यात परमबीरसिंह यांच्या मालमत्ताही जप्त केल्या जाऊ शकतात.

परमबीरसिंह यांना अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले असून, मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासही बजावले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारसह केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) न्यायालयाने नोटीस बजावली आहे. सुनावणीवेळी परमबीरसिंह यांच्या वकिलांनी ते भारतातच असल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यांच्या जिवाला धोका असल्याने ते लपून बसल्याचेही वकिलांनी सांगितले. पुढील 48 तासांत सीबीआयसमोर हजर राहण्याची कबुलीही त्यांनी दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी 6 डिसेंबरला होणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीवेळी परमबीरसिंहांवर ताशेरे ओढले होते. न्यायालय म्हणाले होते की, परमबीरसिंह हे जगाच्या कोणत्या भागात सध्या आहेत? तुम्ही या देशात आहात की परदेशात? आधी तुमचा ठावठिकाणा सांगा. तुमचा व्यवस्थेवर किती अविश्वास आहे, हेच तुम्ही दाखवून देत आहात. तुम्ही पोलीस आयुक्त होता म्हणून तुम्हाला वेगळी वागणूक मिळणार नाही. केवळ अटकेपासून संरक्षण मिळाले तरच भारतात येणार, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

परमबीरसिंह यांच्यावर खंडणीचे चार गुन्हे दाखल आहेत. ते परदेशात पळून गेल्याची चर्चा सुरू आहे. खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात परमबीरसिंह यांच्यासह विनयसिंह आणि रियाज भाटी यांना मुंबईतील न्यायालयाने फरारी गुन्हेगार घोषित केले. गोरेगाव पोलिसांकडे हा गुन्हा दाखल आहे. हे आरोपी फरार असून, ते सापडत नसल्याने त्यांना फरारी गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. यानुसार न्यायालयाने परमबीरसिंह यांच्यासह तिघांना दणका दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT