Mahapalika Election News : महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा होताच मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ मुंबईवर वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेचा गड ढासळल्यानंतर या निवडणुका केवळ महापालिकेपुरत्या न राहता मराठी नेतृत्व, ठाकरे ब्रँड आणि मुंबईच्या सत्तेचा फैसला करणाऱ्या ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही भाऊ अनेकदा एकत्र दिसत असले तरी त्यांच्या युतीबाबत मात्र अद्याप संभ्रमावस्था कायम आहे.
अधिकृत घोषणा अद्याप नाही
महापालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. थेट भेटीगाठी नसल्या तरी दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या सूचक वक्तव्यांमुळे ठाकरे बंधूंची युती पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक कार्यक्रमांमधील सौहार्दपूर्ण उल्लेख, तसेच नेत्यांच्या पातळीवरील ‘सकारात्मक संकेत’ यामुळे राजकीय चर्चांना बळ मिळाले आहे, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. यामागे राज ठाकरे यांनी मोठी अट टाकल्याने पेच निर्माण झाली असल्याची माहिती आहे.
बालेकिल्ल्यांत तडजोड नाही!
उद्धव ठाकरेंची शिवसेना-मनसे युतीच्या चर्चा वेग घेत असताना जागावाटपाचा मुद्दा कळीचा ठरतो आहे. शिवतीर्थावरील भेटीनंतर युतीची शक्यता वाढली असली तरी मनसेने आपल्या अटी स्पष्ट केल्या आहेत. जास्त जागा नकोत, पण आमच्या प्रभावाच्या जागांवर तडजोड होणार नाही, असा ठाम सूर मनसेकडून लावण्यात आला आहे. पक्षाने ४० ते ५० निर्णायक जागांवर दावा केला असून, लालबाग, दादर, माहीम, परळसह बालेकिल्ल्यांवर हक्क सांगितला आहे. अंतिम निर्णय राज ठाकरेच घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
युती झाल्यास काय फायदा?
ठाकरे बंधूंची युती झाली, तर ती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता राजकीय भावनिक पुनर्मिलन ठरू शकते. ‘मराठी अस्मिता’ आणि ‘मुंबईवर मराठी नेतृत्व’ हा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येऊ शकतो. संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रचारातील धार यामुळे महायुतीला कडवी झुंज देणे शक्य होईल. विशेषतः तरुण मराठी मतदार आणि नाराज शहरी वर्ग पुन्हा आकर्षित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
युती न झाल्यास काय नुकसान?
ठाकरे बंधू वेगवेगळे लढल्यास त्याचा थेट फायदा सत्ताधारी महायुतीला होण्याची शक्यता आहे. अनेक प्रभागांमध्ये शिवसेना (ठाकरे) आणि मनसेची मते मिळून विजय शक्य असतो; मात्र स्वतंत्र उमेदवार दिल्यास मतफुटीमुळे पराभव ओढवू शकतो. त्यामुळे मुंबईतील मराठी नेतृत्व अधिक कमकुवत होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे, शिवाय ‘एकत्र येऊ शकले नाहीत’ हा संदेश मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.