Nana Patole, Jayant Patil, Ajit Pawar
Nana Patole, Jayant Patil, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Nana Patole on NCP : नाना पटोलेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा; म्हणाले, "मुख्यमंत्री पदाचं..."

सरकारनामा ब्यूरो

Congress, NCP and Thackeray Group : राज्यातील २५३ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या. त्यात महाविकास आघाडीला सर्वात जास्त ठिकाणी यश मिळाले आहे. महाविकास आघाडीतही राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त कृषी उत्पन्न बाजार समितींवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असल्याचा दावा केला. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या तोंडात साखर पडो, असे म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले होते, "महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी(NCP)चा होणार, हे आता सगळ्यांनी मान्य केले आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल. जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर यावर एकमतानं चर्चा होईल, पण आमच्यात कोणताही वाद नाही." तत्पुर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यात ठिकठिकाणी आजित पवारांच्या नावाने फलक लागले होते.

आता जयंत पाटलांनी केलेल्या विधानावर पवार यांनीही मिश्किल टिपण्णी केली. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचे म्हणणे खरे ठरो. सरकारला दहा महिने पूर्ण झालेत, पण जनतेच्या मनात या सरकारबद्दल समाधान असल्याचे दिसत नाही." राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदावरुन केलेल्या विधानांमुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना नाव न घेता टोला लगावला आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, "ते त्यांच्या पक्षाचे बोलतात. ते महाविकास आघाडीचे बोलत नाहीत. प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. ते त्यांनी पहावे. शेवटी ज्यांच्या जागा अधिक त्यांचा मुख्यमंत्री होतो. त्याचा कौल जनता देते. त्यामुळे त्यावर अधिक बोलणे योग्य नाही." यावेळी पटोले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्यसरकारवही टीका केली. पटोले म्हणाले,"अवकाळी, गारपीटमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री रुसून गावाला जातात. उपमुख्यमंत्री मॉरेशिसला जातात. इकडे शेतकरी भरपाईसाठी वाट पाहत आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना फसवी आहे. त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT