Nana Patole | Rashmi Shukla | Devendra Fadanvis
Nana Patole | Rashmi Shukla | Devendra Fadanvis  Sarkarnama
मुंबई

रश्मी शुक्लांना तिसरा धक्का नाना पटोले देणार; सोबत फडणविसांनाही इशारा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शुक्ला यांच्याविरोधात यापूर्वी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाणे आणि मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा फोन टॅपिंगप्रकरणी भारतीय तार अधिनियम कायद्यातील कलम २६ प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शुक्ला यांच्याविरोधात ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले आहे.

आज मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले, रश्मी शुक्ला पुणे पोलिस आयुक्त असताना त्यांनी माझा टॅप केला. पोलिसांनी याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पण हे माझी बदनामी करण्याचे काम आहे आणि या व्यक्तिगत बदनामी बद्दल मी रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहे. याशिवाय सध्या मुख्य आरोपी म्हणून केवळ रश्मी शुक्ला यांचेच नाव समोर आले आहे. मात्र अधिक चौकशी करुन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जर यामध्ये सहभाग असेल तर त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल, असे पटोले यांनी सांगितले आहे.

रश्मी शुक्ला यांनी त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यावर न्यायालयाने २५ मार्च पर्यंत शुक्ला यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.

मागील वर्षी विधिमंडळाच्या अधिवेशनात २०१५ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीमधील अनेक नेते, अधिकारी यांचे फोन टॅपिंग झाल्या प्रकरणी प्रश्‍न उपस्थित झाला होता. या आरोपांची पडताळणी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. संबंधित समितीने २०१५ ते २०१९ या कालावधीमधील फोन टॅपिंगची पडताळणी केली होती. या समितीने राज्य सरकारकडे अहवाल दिला होता. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी रश्मी शुक्ला असताना हे फोन टॅपिंग झाले होते. सरकारने या अहवालाच्या आधारे पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. शुक्‍ला यांनी त्यांच्या कार्यकाळात बेकायदा पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

याबाबत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते, शुक्ला यांनी नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडे यांचे फोन टॅप केले होते. नाना पटोले यांच्या नावासमोर अमजद खान असे लिहून त्यांचे फोन टॅप केले होते. बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे यांचे नाव अभिजित नायर तर आशिष देशमुख यांचे नाव महेश साळुंके असे दाखवले होते. शुक्ला यांनी कायद्याचा भंग केला आहे. यात शुक्ला यांच्यावर सूड भावनेतून कारवाई केलेली नाही. ही घटना काल घडलेली नाही. यावर विधानसभेत चर्चा होऊन चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आता सरकारने स्वीकारला आहे, असेही वळसे पाटील यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT