Sameer Wankhede, Nawab Malik
Sameer Wankhede, Nawab Malik sarkarnama
मुंबई

मलिकांचे वानखेडेंवरील मौन आता नवीन वर्षातच सुटणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासह कुटुंबावर सातत्याने आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आता पुढील काही महिने मौन बाळगावे लागणार आहे. नवीन वर्षातच त्यांना वानखेडे यांच्याविषयी ट्विट करणे किंवा सार्वजनिक व्यासपीठावर आरोप करता येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या दाव्यावर सुनावणीदरम्यान सोमवारी हे स्पष्ट झालं.

समीर वानकेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. मलिक यांना आपण व आपल्या कुटुंबीयांबद्दल बोलण्यास निर्बंध घालावेत, अशी मागणीही वानखेडे यांनी केली होती. यावर एक सदस्यीय खंडपीठाने मलिक यांच्यावर पूर्णपणे निर्बंध घालता येणार नाहीत. परंतु, वानखेडे यांच्याबद्दल जाहीरपणे विधाने करताना मलिक यांनी योग्य काळजी घ्यावी, असा निर्णय देत मलिकांना दिलासा दिला होता.

या निर्णयाविरोधात वानखेडे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायाशीध एस. जे. काथेवाला आणि न्यायाधीश मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. यावेळी मलिकांच्या वकिलांनी मलिक 9 डिसेंबरपर्यंत वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कोणतंही ट्विट किंवा भाष्य करणार नाहीत, असं न्यायालयात सांगितलं होतं. आता मलिकांनी एक सदस्यीय खंडपीठाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

या याचिकेवर ज्ञानदेव वानखेडे यांनाही कुठला आक्षेप नसल्याचे न्यायालयात सांगितले आहे. मलिकांनी आपल्या याचिकेमध्ये या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एक सदस्यीय खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणीही केली आहे. वानखेडे यांनीही सहमती दर्शवल्याने आता मानहानीचा दावा पुन्हा एकदा एक सदस्यीय खंडपीठासमोर जाणार आहे. तसेच न्यायाधीश ए. जे. काथेवाला आणि न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी एकसदस्यीय खंडपीठाचा आधीचा निर्णय बाजूला ठेवला आहे.

त्याचप्रमाणे न्यायालयाने मलिकांना मानहानीच्या दाव्यावर 9 डिसेंबरपर्यंत तारखेपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. तर वानखेडे यांना त्यावर ता. 3 जानेवारी 2021 पूर्वी आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. वानखेडे यांनी आपली बाजू मांडल्यानंतर 12 आठवड्यांत या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत मलिकांना वानखेडे कुटुंबीयांविषयी ट्विट किंवा सार्वजनिक व्यासपीठावर बोलता येणार नाही. याबाबत मलिकांनी न्यायालयात तसे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत मलिकांना आता सार्वजनिक व्यासपीठावर वानखेडे कुटुंबावर आरोप करता येणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT