<div class="paragraphs"><p>Ncp Leader Nawab Malik </p></div>

Ncp Leader Nawab Malik

 

Sarkarnama

मुंबई

मलिकांचा फुसका बार; भाजप नेत्यांवर बॉम्ब फुटलाच नाही...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिवाळीआधी भाजप (BJP) नेत्यांना सूचक इशारा दिला होता. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनामध्ये (Assembly winter Session) भाजप नेत्यांविषयी विस्फोटक माहिती सादर करणार असल्याचा दावा मलिकांनी केला होता. पण मंगळवारी संपलेल्या अधिवेशनामध्ये मलिकांचा हा दावा फुसका बार ठरला. मलिकांनी एकाही भाजप नेत्याविरोधात साधे आरोपही केले नाहीत.

मलिक यांनी दिवाळीपुर्वी पत्रकार परिषद घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच त्यांनी भाजप नेत्यांनाही सूचक इशारा दिला होता. हिवाळी अधिवेशनात भाजपकडून माझ्यावर टीका केली जाईल. आरोप केले जातील. पण मीही त्यांना उत्तर देणार आहे. त्यासाठी माहिती गोळा करत आहे. माझ्याकडे काही नेत्यांविषयी विस्फोटक माहिती आहे. या माहितीनंतर काही भाजप नेत्यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असं टीकास्त्र मलिक यांनी सोडलं होतं.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर (Aryan Khan Drugs Case) मलिकांनी हे भाजप नेत्यांचेच षडयंत्र असल्याचा आरोप केला होता. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ड्रग्ज माफियांशी थेट संबंध असल्याचाही गंभीर आरोप केला होता. भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावही त्यांनी आरोप केले. तसेच इतर काही नेत्यांची नावे घेत मलिकांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. काही भाजप नेत्यांविषयी आपल्याकडे विस्फोटक माहिती असून अधिवेशनात ही माहिती देणार असल्याचे मलिक त्यावेळी म्हणाले होते.

मलिकांच्या या घोषणेनंतर फडणवीस यांनीच मलिकांना गोत्यात आणले. मलिकांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्यावर मलिकांनी खुलासाही केला. त्यामुळे दिवाळी बरेच राजकीय फटाके फुटले. असेच फटाके अधिवेशनातही फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण मलिकांनी एकाही भाजप नेत्याविरोधात आवाज उठवला नाही. काही तात्कालिक मुद्यांवरून त्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत मलिकांना आपले म्हणणे खरे करता आले नाही, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मलिकांनी एका जिल्ह्यातील देवस्थाने व मशिदींच्या जागांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा अधिवेशनाआधी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर, १ हजार कोटींची तब्बल ५१३ एक्कर देवस्थान व इनामी जमीन हडप केल्याचा आरोप त्यांनी केला. पण धस यांनी हे आरोप फेटाळून लावत मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला. हा आरोप वगळता मलिक भाजप नेत्यांबाबत शांतच राहिल्याचे दिसले.

कारवाईची टांगती तलवार

मागील काही दिवसांपासून मलिकांकडून आपल्या घरी सरकारी पाहूणे येणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. त्यांच्या घरी ईडी किंवा आयटीचा छापा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण अद्याप तपास यंत्रणाही त्यांच्या घरी गेलेल्या नाहीत. समीर वानखेडे प्रकरणात मलिकांना काहीही न बोलण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पण मलिक अधिवेशनात भाजप नेत्यांवरील आरोपांबाबतही काही बोलले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT