jasmine wankhede, nawab malik
jasmine wankhede, nawab malik sarkarnama
मुंबई

जास्मिन वानखेडेंचे 'ते' फोटो व्हायरल करत मलिकांचा धक्कादायक आरोप

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांकडून (Nawab Malik) सातत्याने अंमलीपदार्थ विभाग (NCB) व विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना लक्ष्य केलं जात आहे. तसेच वानखेडे यांच्या भगिनी जास्मिन वानखेडे (Jasmin Wankhede) यांच्यावरही ते निशाणा साधत आहेत. गुरूवारी त्यांनी जास्मिन यांचे काही फोटो ट्विटवर शेअर करत धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे वानखेडे व मलिकांमधील संघर्ष आता वाढला आहे.

भाजपच्या इशाऱ्यावरून केवळ प्रसिध्दीसाठी व काही ठराविक लोकांना त्रास देण्यासाठी वानखेडे काम करत असल्याचा आरोप मलिकांकडून सातत्याने केला जात आहे. गुरूवारी त्यांनी पुन्हा एकदा जास्मिन यांचे काही फोटो शेअर करत नवे आरोप केले आहेत. मलिकांनी आपल्या ट्विट अकाऊंटवर जास्मिन यांचे मालदीव येथील तीन फोटो शेअर केले आहेत.

माध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले, कोविड काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते. तर स्वत: वानखेडे दुबईत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांना एनसीबीमध्ये आणण्यात आलं. आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात आलं. पण ही हत्या की आत्महत्या याचा उलगडा झालाच नाही. उलट सिनेसृष्टीत एनसीबीचा खेळ सुरू झाला, असं मलिक म्हणाले.

रिया चक्रवर्तीला अडकवण्यात आलं. चार-चार हजार रुपयांच्या पेमेंटवर गुन्हे दाखल झाले. अभिनेत्री, अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभं केलं गेलं, असं सांगत मलिक यांनी ही सर्व वसुली मालदीव मध्ये झाल्याचा धक्कादायक आरोप केला. कोविड काळात सिनेसृष्टी मालदीवमध्ये होती. अधिकाऱ्याच्या परिवातील लोक मालदीवमध्ये तर स्वत: अधिकारी दुबईत होते. याचा खुलासा त्यांना करावा लागेल. त्यांनी सांगावं, ते दुबईत गेले होते की नाही. त्यांचे कुटूंबातील लोक मालदीवमध्ये होते की नाही. मालदीव व दुबईमध्येच सर्व तडजोडी झाल्याचा संशय आहे, असं मलिक म्हणाले.

दरम्यान, आर्यनचा जामीन बुधवारी फेटाळल्यानंतर पुन्हा एकदा मलिक यांनी वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. न्यायाधीशांच्या निर्णयावर कुठलाही आक्षेप नसल्याचे सांगत मलिक यांनी एनसीबीच्या युक्तीवादवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, किल्ला न्यायालयापासून एनडीपीएस न्यायालयापर्यंत एनसीबीने वेगवेगळा युक्तीवाद केला आहे. काही लोकांना अडकविण्यासाठी हा डाव आहे. असे बरेचसे डाव आम्ही पाहिले आहेत. आमच्या केसमध्ये पाच लाखाचे व्हॉट्स अॅप चॅट न्यायालयात दाखवत राहिले. पण त्याचा उल्लेख आरोपपत्रात केला नाही. लोकांना जामीन मिळू द्यायचा नाही, हे धोरण आहे. प्रसिध्दीसाठी लोकांना खोटं अडकविले जात आहे. पैसे गोळा करण्याचं, खंडणी वसुल करण्याचं काम मुंबईत त्यांच्याकडून सुरू आहे, असा आरोप मलिक यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT