Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : शेलारांसोबत युती का केली ? : पवारांचे स्पष्टीकरण ; म्हणाले, 'ते काम आमचं..'

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar : काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए निवडणुकीचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. यात अध्यक्षपदी पवार-शेलार पॅनेलचे अमोल काळे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे. त्यांनी मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार संदीप पाटील यांचा पराभव केला. अमोल काळे यांना १८१ मत मिळाली. तर संदीप पाटील यांना १५८ मत मिळली. यामुळे पुन्हा एकदा राजकारणी क्रिकेटरवर भारी पडल्याचं चित्र आहे. (mca election latest news)

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत युती करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अमोल काळे यांना निवडून आणले. या निकालानंतर शरद पवार यांच्या या खेळीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. शरद पवार यांनी भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना निवडणुकीत पाठिंबा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावरून राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नवं समीकरण जुळत असल्याच्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावरून आता खुद्द शरद पवारांनी खुलासा केला आहे. ते मुंबई माध्यमांशी बोलत होते.

"गेल्या अनेक वर्षांपासून मी क्रिकेटशी संबंधित संस्थांमध्ये आहे. त्यामध्ये मीच काय इतरही राजकारणी कधी राजकारण आणत नाहीत. मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी होते. मोदी माझ्या बैठकीला हजर राहत. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हाच अरुण जेटली दिल्लीचे तर आता माहिती प्रसारण मंत्री असलेले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष होते. त्यामुळे मी देशाचा अध्यक्ष आणि हे सगळे राज्यांचे अध्यक्ष असं आम्ही सर्वांनी तेव्हा एकत्र काम केलं. तेव्हा लोकांना ते लक्षातही आल नव्हत. फक्त आताच याची चर्चा होत आहे. मात्र, याठिकाणी आम्ही कधीही राजकारण आणत नाही," असे पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, "आशिष शेलार जवळपास ५ वर्षांपुर्वीही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. काही क्षेत्रं अशी असतात, जिथे राजकारण आणायचे नसते. खेळाडूंना प्रोत्साहित करणे, त्यांना खेळासाठी विविध सुविधा देणे, हे आमचे काम आहे. त्यांच्या खेळात आम्ही कधी पडत नाहीत,"

"सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्यासारखे उभं आयुष्य क्रिकेटला योगदान दिलेल्या लोकांच्या ज्ञानाचा उपयोग नवीन खेळाडू निवडणे आणि त्यांना तयार करणे यासाठी व्हायला हवा. हे काम त्यांचं आहे. त्यांना उद्या स्टेडियम बांधायचे काम जमणार नाही. ते काम आमचं आहे. कोणते खेळाडू निवडायचे हे काम त्यांचे आहे," असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT