Nationalist Congress Party President
Nationalist Congress Party President  Sarkarnama
मुंबई

NCP News: पवारांनी खरंच भाकरी फिरवली; तर प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मंगळवारी (दि.2) शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. मात्र, त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे अखेर त्यांनी शुक्रवारी (दि.5 मे ) आपला निर्णय मागे घेतला.

वाय.बी.सेंटर येथे पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी आपण हा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली. पण यावेळी बोलताना त्यांनी पुढील कार्यकाळात पक्षाच्या संघटनेत काही बदल करण्यासंदर्भातील संकेत दिले. त्यांच्या या संकेतामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार म्हणाले की, "मी पुन्हा अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे गरजेचे असते. त्यामुळे माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करण्यावर भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसापर्यंत पोचवण्यासाठी यापेक्षा अधिक जोमाने काम करील", असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

शरद पवार यांच्या भाकरी फिरण्याच्या वक्तव्यानंतर आणि आज पुन्हा पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे. कारण जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदावर जवळपास पाच वर्षापासून आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमायचं झालं तर दुसरं कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे या तीन प्रमुख नावाची चर्चा आहे. शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा पाच वर्षांपूर्वी जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले त्यावेळीही होती.

पण काही कारणाने त्यावेळी हे नाव मागे पडले. आता पुन्हा शशिकांत शिंदे यांच्या नावाचा विचार होणार की धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांच्या नावाचा विचार होणार? की अजून दुसरं कोणी? यावर कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतरे असल्याचं बोललं जात आहे.

राजेश टोपे यांनी कोरोनाच्या काळात आरोग्य मंत्री म्हणून केलेलं काम महाराष्ट्रभर पोचलं. या निमित्ताने त्यांची सकारात्मक प्रतिमा महाराष्ट्राच्या कोणा कोपऱ्यात पोहचली. तर धनंजय मुंडे हे तरुण नेतृत्व आणि धडाडणारी तोफ म्हणून राष्ट्रवादीच्या संघटनेत महत्त्वाचे नाव आहे. याबरोबरच शशिकांत शिंदे यांचेही नाव चर्चेत आहे.

दरम्यान, येत्या काळात राज्यात महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. येत्या वर्षभरात या निवडणुका निश्चितपणे होतील. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत.

त्यामुळे शरद पवार यांचे भाकरी फिरवण्याचे वक्तव्य आणि आज पुन्हा एकदा "पुढील काळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे", या वक्तव्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदल झाले तर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची संधी कुणाला मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT