Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : 'त्या' पाच मंत्र्यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं मोठ विधान ; मला सगळी माहिती..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : भाजप पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या पाच मंत्र्यांवर नाराज आहेत, त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची बातम्या काही दिवसापासून माध्यमांमध्ये येत आहेत. या चर्चांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराम दिला आहे. ते काल (मंगळवारी) रात्री उशिरा वरळी येथे बैठकीनंतर बोलत होते. या बैठकीला शिवेसेनेचे आमदार, खासदार, मंत्री अन् जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

१९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, तर मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होणार आहे. याबाबत वरळी येथील एनएससीआय येथे महत्वाची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना उपस्थित मंत्र्यांना मोठा दिलासा दिला. "आपल्या कोणाही मंत्र्यांचा राजीनामा होणार नाही, निश्चिंत राहा," अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

"मला सगळी माहिती आहे, कोण कुठे काय करते ते,' असे म्हणत एकनाथ शिंदे म्हणाले, "शिवसेनेच्या पाच मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार, अशा बातम्या वृत्तपत्रात आल्या आहेत. या बातम्या सरकारमधील जबाबदार मंडळींनी पेरल्या आहेत. याचा जाब विचारला पाहिजे,"

"आपल्याला देशात जायचे आहे. महाराष्ट्राबाहेर सेनेची ताकद वाढवायची आहे. तुमच्या मतदारसंघातील प्रकल्पांना, योजनांना मंजुऱ्या दिल्या त्यामुळे मतदारसंघात ठाण मांडून बसा, मंजूर प्रकल्पांची अंमलबजावणी करा," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं यासाठी काही आमदाराची इच्छा आहे. अशातच अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना डच्चू द्यावा, असे सांगितल्याचे समजते.

मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या चार ते पाच मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या चर्चांना शिंदे गटातील नेत्यांनी अफवा असल्याचे म्हटलं आहे.

"कोणाला मंत्री ठेवायचं हा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे," अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तर मंत्री संदीपान भुमरे ही अफवा असल्याचं म्हणत आहेत. “मंत्रिमंडळातून डच्चू देणार या विरोधकांनी पेरलेल्या बातम्या आहेत.मंत्रिमंडळ विस्तार जवळ आला की आशा बातम्या येत असतात”, असं भुमरे म्हणाले.

या सर्व बातम्यांमध्ये काहीही तथ्थ नाही, असं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. ज्या मीडियानं या बातम्या दिल्या त्यांना त्यांनी थेट आव्हानही दिलं.

"याबाबत अशी कुठलीही वस्तूस्थिती नाही, ज्या बातम्या मीडियानं दाखवल्या त्यात तथ्य नाही. या बातम्या टेबल स्टोरी आहेत, यामध्ये कुठलंही तथ्य नाही" असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT