CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray  
मुंबई

शिवसेना `हाय अलर्ट`वर : आमदारांना मुंबईत येण्याचा आदेश... हाॅटेल ट्रायडंटमध्ये मुक्काम!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होत नसल्याने आता शिवसेनेने पुढची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वपक्षाच्या आमदारांबाबत कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सर्वांना `कडेकोट बंदोबस्तात` ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून 2022 रोजी निवडणूक (Rajya sabha Election) होत आहे. राज्यसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) शिष्टमंडळाने आज (3 जून) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र भाजपने महाविकास आघाडीची ऑफर साफ नाकारली. त्यामुळे भाजप (BJP) तिसरी जागा लढवण्यावर ठाम असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणूकीत होणारा घोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या सर्व विधानसभा सदस्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेला पाठिंबा असलेल्या सर्व सहयोगी विधानसभा सदस्यांनी बुधवार (8 जून) ते शुक्रवार (10 जून) या कालावधीत आपल्या मतदार संघात न राहता तातडीने मुंबईत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या सर्व सदस्यांची राहण्याची व्यवस्था नरिमन पॉईट येथील हॉटेल ट्रायडेंट येथे करण्यात आल्याचे या आदेशात सांगण्यात आले आहे.

त्यापूर्वी सोमवार (6 जून) मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' या निवासस्थानी राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाजपला विधान परिषदेच्या अतिरिक्त एका जागेची ऑफर देण्यात आली होती. मात्र, ती ऑफर फेटाळून लावत भाजपनेही महाविकास आघाडीला तीच ऑफर दिली. त्यामुळे आजच्या भेटीत ऑफरचा खेळ रंगला होता. दुपारी तीनपर्यंत कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.

भाजपकडून राज्यसभेसाठी अनिल बोंडे, पियुष गोयल आणि धनंजय महाडिक हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत, तर शिवसेनेकडून दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र प्रत्येकी एक उमेदवार दिला आहे. शिवसेना आणि भाजपकडेही दुसरा आणि तिसरा उमेदवार जिंकण्याएवढी मते नाहीत, त्यामुळे ही निवडणूक अपक्ष आमदारांच्या हाती असणार आहे. तेच या निवडणुकीतील खरे सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT