Gunratan Sadavarte
Gunratan Sadavarte Sarkarnama
मुंबई

जामिनावर सुटताच चोवीस तासांत सदावर्ते पुन्हा अडचणीत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता.26) वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांना जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. पण त्यानंतर चोवीस तासांत पुन्हा त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका प्रकरणात सदावर्ते यांना मिळालेला अटकपूर्व जामीन रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

नागपूर खंडपीठाने ही याचिका दाखल करून घेतली असून सदावर्ते यांच्यासह राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करून अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हा जामीन रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. (Gunratan Sadavarte Latest Marathi News)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात महाराष्ट्रात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हल्ल्याच्याच दिवशी ८ एप्रिलला सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. उच्च न्यायालयाने काल (ता.26) सदावर्ते यांना जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. यानंतर सदावर्तेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

तुरुंगातून सुटताच सदावर्ते यांनी राज्यात आज आणीबाणीची स्थिती असल्याचा आरोप केला आहे. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारशी पंगा घेतल्याचे समोर आले आहे. आणीबाणीचा आरोप करीत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचलं आहे. ते म्हणाले की, राज्यात आता आणीबाणीची स्थिती आहे. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. याचबरोबर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत. राज्य सरकारनं आपल्या वागण्याचा थोडा तरी विचार करावा आणि कष्टकरी समाजाला सरकारने समजून घ्यावं.

तुरुंगातून सुटका होताच सदावर्ते यांनी काल (ता.26) घोषणाबाजी केली होती. ते म्हणाले होते की, हम है हिंदुस्थानी, भारताच्या संविधानाचा हा विजय आहे. भारताच्या संविधानापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. माझी मुलगी झेन सदावर्ते आणि माझी पत्नी जयश्री पाटील यांच्यासोबत राहून माझ्या मित्र परिवाराने या अन्यायाविरुद्ध मला सोबत दिली. महाराष्ट्रातल्या देशातल्या हिंदुस्तानी कष्टकरी स्वागताला आले आहेत. तो आमचा पुढचा केंद्रबिंदू असेल. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे करता येईल ते सर्व आम्ही करु.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT