Jayantrao Patil, R. R. Patil
Jayantrao Patil, R. R. Patil sarkarnama
मुंबई

वाढदिवशीच जयंत पाटलांवर आबांना खांदा देण्याची वेळ आली होती..

सरकारनामा ब्युरो

सांगली : राष्ट्रवादी कॉग्रेससाठी आजचा दिवस महत्वाचा. कारण आज राष्ट्रवादीचे (ncp)प्रदेशाध्यक्ष व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांचा जन्मदिवस, तर राष्ट्रवादी नेते दिवंगत आर.आऱ. पाटील यांचा आज स्मृतीदिन. यानिमित्ताने आज जयंत पाटलांनी (Jayantrao Patil)आर. आर. बाबांना अभिवादन केलं आहे. ''महाराष्ट्रातील जनता आर. आर. आबांना (R. R. Patil)आणि त्यांच्या कार्याला कधीही विसरणार नाही,'' अशा भावना जयंत पाटलांनी व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचा आज वाढदिवस. पण, २०१५ मध्ये याच दिवशी जयंत पाटील यांना राजकारणातील आपल्या एका महान सहकाऱ्याला खांदा देण्याची वेळ आली होती. याच दिवशी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी अखेरचा श्‍वास घेतला होता.

आबांचे १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. याच दिवशी जयंत पाटील यांचा वाढदिवस असतो. या दिवशी जिल्ह्यावर शोककळा पसरली होती. अंजनीत आर. आर. पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार होते. धायमोकलून लोक रडत होते. आबांच्या पार्थिवाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांनी खांदा दिला होता. आज त्याला सात वर्षे झाली, मात्र ते दुःख कुणीही विसरलेले नाही. जयंत पाटील यांनी आज वाढदिवस साजरा करण्याआधी आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. ''आबा तुमचे कार्य राज्यातील जनता कधीच विसरू शकणार नाही," अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

जयंत पाटील आणि आर. आर. पाटील यांची राजकीय कारकीर्द समांतरच राहिली. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातून राजकारणाची धुरा कोण वाहणार, असा प्रश्‍न पुढे आला. त्यावेळी जयंतरावांच्या मातोश्री कुसुमताईंनी जयंत पाटील यांच्याकडे ती धुरा सोपवावी, असा निर्णय दिला आणि जयंत पाटील राजकारणात आले. त्याउलट आर. आर. पाटील यांचा प्रवास राहिला.

अंजनीसारख्या एका छोट्या गावातील फाटक्या कुटुंबातून ते पुढे आले. संघर्षातून दिवस काढत जिल्हा परिषद लढवली, जिंकली. पुढे ध्यानीमनी नसताना ते विधानसभेच्या आखाड्यात उतरले आणि बलाढ्य आमदार दिनकर पाटील यांना पराभूत करून राजकारणात मोठी झेप घेतली. शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर जिल्ह्यातून पहिल्यांदा त्या पक्षात जाणारे जयंत आणि आर. आर. पाटील हेच होते.

नव्याने स्थापन झालेला हा पक्ष राज्यात सत्तेत येत असताना या दोन्ही नेत्यांना मंत्रीपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली. आर. आर. पाटील पक्षाचा राज्यव्यापी चेहरा झाले आणि त्यांनी वादळ उठवले. त्याचे बक्षिस म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी मिळाली. गृहमंत्री म्हणून त्यांनी छाप सोडणारे काम उभे केले. जयंत पाटील यांच्याकडे सलग नऊ वर्षे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या राहिल्या. अर्थकारणातील त्यांचा अनुभव प्रचंड आहे. ग्रामविकास आणि जलसंपदा या खात्यांची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील इंजिनिअर नेहमीच प्रभावी छाप सोडत राहिला आहे.

 सन २०१४ ला देशात आणि राज्यात भाजपचे वारे वाहत होते. त्याचवेळी जिल्ह्याच्या राजकारणात मात्र न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. आर. आर. पाटील यांना कर्करोगाचे निदान झाले. आबांनी या असाध्य आजारावर उपचार करून घ्यायला विलंब लावला, अशी हळहळ आणि खंत त्यांचे समर्थक आजही व्यक्त करतात. ‘आर. आर. तुम्ही मला वेळीच हे सांगायला हवे होते,' हे शरद पवार यांचे शब्द वेदना देणारे होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT