Rahul Shewale
Rahul Shewale Sarkarnama
मुंबई

राहुल शेवाळेंचे स्पष्टीकरण : गटनेत्यावरील नाराजीमुळे सर्वांनी मिळून गटनेता बदलला

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्यातील शिवसेनेत फुट पडली आहे. शिवसेनेचे बंडखोर 40 आमदारांच्या पाठोपाठ 12 खासदारही भाजपच्या गोटात गेले आहेत. लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर खासदार राहुल शेवाळे हेच शिवसेनेचे गट नेते असल्याचे जाहीर केले आहे. तर शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत यांनी या निर्णयाला आव्हान देत लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पत्र दिले. तसेच शिवसेनेने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या संदर्भात खासदार राहुल शेवाळे यांनी आपले मत व्यक्त केले. ( Rahul Shewale's explanation: Due to displeasure with the group leader, everyone changed the group leader )

खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, लोकसभा अध्यक्षांनी कायदेशीर कागदपत्रांची पुर्तता केली आहे. त्याच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पूर्ण गटाला गटनेता म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याची जाणिव झाल्याने ते अशा गोष्टी करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, आमच्याकडून पक्ष शिस्तीचे उल्लंघन झालेले नाही. पक्ष शिस्तीचीचे उल्लंघन झाले नसल्याने आमच्या विरोधातील तक्रारीचा काही प्रश्नच उद्भवत नाही. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्याला लोकसभा अध्यक्ष कायदेशीर उत्तर देतील. मी गट नेता आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्याकडे कोणताही अधिकार नाही. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. ते लोकसभेच्या सदस्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाहीत. लोकसभेचा पक्षातील गटनेता वेगळा असतो. राज्यसभेतील गटनेता वेगळा असतो. त्यामुळे लोकसभेतील सदस्यांवर कारवाई करण्याचा अधिकार लोकसभेतील गटनेत्याला असतो. राज्यसभेतील गटनेत्याला राज्यसभेच्या सदस्यांवर कारवाई करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे राऊत यांनी कदाचित राज्यसभा सदस्यांबाबत पत्र दिले असतील.

शिवसेनेच्या संसदीय कार्यालयाचा आम्ही ताबा घेतलेला नाही. आम्ही नियमितपणे पूर्वीही शिवसेना कार्यालयात जात होतो. आजही जातो आणि पुढेही जात राहू. आमचे शिवसेनेतील 19 खासदारांचा गटनेता म्हणून लोकसभा अध्यक्षांनी मला निवडले आहे. त्यामुळे यात गटतट काहीही नाही. येथे अखंड शिवसेना आहे. गटनेत्यावरील नाराजीमुळे सर्वांनी मिळून गटनेता बदलला, असे त्यांनी स्पष्ट केले.

विनायक राऊत गटनेते असतील तर त्यांनी 19 खासदारांना विचारून लोकसभा अध्यक्षांना पत्र द्यायला हवे होते. त्यांनी एकाही खासदाराशी संपर्क साधला नाही. त्यासंदर्भात बैठक घेतली नाही. त्यामुळे त्या पत्राला काही कायदेशीर अर्थ नाही, असे त्यांनी सांगितले.

बंडखोरांविरोधात शिवसेना उमेदवार देण्याची तयार करत आहे. यावर शेवाळे यांनी सांगितले की, कोण काय करत आहे हे आम्हाला माहिती नाही. त्याचा आम्ही विचारही करत नाही. आम्ही हिंदुह्रद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे न्यायचा ध्यास घेतला आहे. हिंदुत्त्वाचा विचार, राष्ट्रहितातून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे निर्णय घेतील त्या निर्णयाला पाठिंबा द्यायचा, ही भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यावर आमचे लक्ष केंद्रीत आहे. त्यामुळे कोण काय करते याकडे लक्ष न देता महाराष्ट्राचे हित व हिंदुत्त्व याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT