Uddhav Thackeray, Raj Thackeray, Narayan Rane News
Uddhav Thackeray, Raj Thackeray, Narayan Rane News Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : राणेंनी कधीच पक्ष सोडला नसता पण....; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' प्रसंग!

सरकारनामा ब्यूरो

Raj Thackeray News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कधीच पक्ष सोडला नसता, पण उद्धव ठाकरे यांच्यामुळेच त्यांना पक्ष सोडावा लागला, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांचे थेट नाव त्यांनी घेतले नाही. मात्र, त्यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्याकडे होता. राणेंच्या बंडाच्यावेळी नेमके काय घडले. तो सारा प्रसंगच आजच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सांगितला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर संपूर्ण भाषणात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जोरदार टीका केली.

यावेळी ठाकरे म्हणाले, ''नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना सोडलीच नसती. राणे पक्ष सोडणार असे कळत होते, तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी त्यांना सांगितले की मी बाळासाहेबांशी बोलतो, त्यावेळी मी बाळासाहेबांना फोन केला. बाळासाहेब मला म्हणाले की नारायण राणे यांना घेऊन ये. पाच मिनिटांनी परत मला फोन आला की नको आणूस, मला तेव्हा त्यांच्या मागून कुणीतरी बोलते, असा आवाज आला. तेव्हा मला राणे यांना सांगावे लागले की येऊ नका.

मग सगळ्या पुढच्या गोष्टी घडल्या आहेत. लोकांनी पक्षातून बाहेर पडावे यासाठी परिस्थिती निर्माण केली गेली आहे. जी परिस्थिती तेव्हा निर्माण झाली, त्याचा हा शेवट (म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड) असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मला त्यांच्या राजकारणाशी काहीही घेणेदेणे नाही, या साऱ्या कारस्थानाला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. मीदेखील पक्षातून बाहेर कधी जातोय याचीच वाट ते बघत होते, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला.

मी जेव्हा त्या पक्षातून बाहेर पडलो त्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर मी इथे जेव्हा भाषण केले होते तेव्हा म्हटले होते. ''माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. मी तेव्हा हेदेखील म्हटले होते हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार आहेत. २००६ मध्ये जेव्हा मी पक्ष स्थापन केला, तेव्हा तो याच शिवतीर्थावर केला होता. मात्र, त्या भाषणात काय झाले कशामुळे झाले तो चिखल करायचा नव्हता, आजही करायाचा नाही आहे. मात्र, काही गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. राज ठाकरेंना शिवसेनापक्षप्रमुख पद हवे होते. राजला मिळाले नाही म्हणून बाहेर पडला, माझ्या स्वप्नातही हा विचार आला नव्हता, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेचे धनुष्यबाण हे शिवधनुष्य होते. हे शिवधनुष्य बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही, मला माहित होते. एकाला झेपले नाही दुसऱ्याला बघा आता झेपते का? आत्ताच त्यांच्या बाजूच्या लोकांनाही सांगतो माझे बोलणे झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका, नंतर मी जे काही बोलेन त्यामुळे तोंड लपवावे लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे) गटाच्या नेत्यांना दिला. सगळ्यांना तो महाबळेश्वरचा प्रसंग आठवतो आहे. मात्र, त्याआधी अनेक गोष्टी घडल्या. हे मी सांगतोय कारण आत्ताची परिस्थिती तुम्हाला समजेल, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT