Virar: कुठल्याही परिस्थितीत भाजपला वसई विरार महापालिकेची सत्ता ताब्यात घ्यायची आहे. त्यासाठी वरिष्ठ नेते कामाला लागले आहेत. आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे आणि आमदार विलास तरे यांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघात अन्य पक्षातील पदाधिकारी, नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावला आहे.
आत्तापर्यंत बहुजन विकास आघाडीचे आठ माजी नगरसेवक, माजी सभापतींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आणखी काही बडे मासे गळाला लागले असल्याचे भाजपचे पदाधिकारी ठामपणे सांगत आहेत. आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे आणि आमदार विलास तरे यांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरु केला असून त्यात ते यशस्वीही ठरत आहेत.
विधानसभेला झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर वसई तालुक्यामध्ये भाजपला अच्छेदिन आले आहे. बहुजन विकास आघाडीला गळती लागली आहे . बहुजन विकास आघाडीतील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी टप्याटप्याने भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीला धक्का बसत असतानाच भाजपमधील निष्ठावानांना इनकमिंग अशीच सुरु राहिली तर उमेदवारी मिळेल, का याची चिंता भेडसावू लागली आहे.
वसई विरारच्या पूर्व भागात विवेक पंडित यांच्या श्रमजीवीचीही ताकद भाजपच्या पाठिशी आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पंडित समर्थकांचाही विचार करावा लागणार आहे. भाजपमध्ये अशीच इनकमिंग सुरु राहिली तर आपल्याला उमेदवारी मिळेल का ? याची चिंता आता भाजपमधील इच्छुकांना सतावू लागली आहे.
वसई विरारमध्ये पहिल्यांदाच सत्ता मिळाल्याने भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी वाढत आहे. त्यात उत्तरभारतीय इच्छुकांची सर्वाधिक संख्या आहे. आयारामांची वाढती संख्या पाहता इच्छुकांना सामावून घेण्याची कसरत भाजपला करावी लागणार आहे. त्यात अपयश आले तर मात्र भाजपमध्ये अंतर्गत कलह होऊन त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची अधिक शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप नेतृत्वाला सर्वसमावेशक निर्णय घेताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बविआचे काही नगरसेवक ,सभापती भाजपमध्ये जात असले तरी येथील कार्यकर्ते मात्र आज हि भक्कमपणे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मागे उभे असल्याने भाजपला बविआच्या नगरसेवकांना घेऊन त्यांचा फायदा होईल का? याचा हि विचार करावा लागणार आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत बविआ आणि इतर पक्षातून येत असलेल्यांना उमेदवारी देताना निष्ठावानांना सामावून घेण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे असणार आहे. एकतर तीनही आमदार आपापल्या विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये आपल्या मर्जीतील उमेदवारांनाच उमेदवार कशी मिळेल, याचा प्रयत्न करतील. त्यातून तीनही आमदारांना आपापसात ताळमेळ ठेऊनच निर्णय घ्यावे लागणार आहेत.
पक्षप्रवेश करणारे आणि भाजपचे नेते कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षप्रवेश केला जात आहे, सांगत असले तरी माजी नगरसेवकांना उमेदवारीची अपेक्षा असल्यानेच ते पक्षप्रवेश करत आहेत, हे उघड सत्य आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत असलेल्या आणि यावेळी उमेदवारी नक्की मिळेल, या अपेक्षेने काम करत असलेल्या इच्छुकांमध्ये घालमेल सुरु झाली आहे. इतकी वर्ष सत्तेचे जे स्वप्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाहिले होते. ते आता पुरे होण्याच्या मार्गावर असतानाच बाहेरून येणार्यांसाठी पायघड्या टाकल्या जात असल्याने आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.