Rohit Pawar News : Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar On NCP Crisis: पस्तीस वर्षे साहेबांसोबत होते ते सोडून गेले, ते नव्या नेत्यासोबत कसे राहतील ? ; रोहित पवारांचा बंडखोरांवर निशाणा

सरकारनामा ब्यूरो

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar: अजित पवारांच्या बंडाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार असे दोन उभे गट पडले आहेत. दोन्ही गटात किती आमदार आहेत, याचा अजून नेमका उलगडा झालेला नाही.

"अजितदादांसोबत गेलेले बहुतांश आमदार पुन्हा आमच्यासोबत येतील," असा विश्वास शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर रोहित पवार हे प्रथमच कर्जत येथे आले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी पक्षात पडलेल्या फुटीबाबत आम्ही आमदारांना अजून जबाबदार धरत नसल्याचे सांगत अनेक आमदारांना कशा पद्धतीने नेले याचा सर्वांनाच अंदाज आहे, असे सांगितले.

रोहित पवार म्हणाले, "गेल्या काही दिवसात पाहिले तर, जे नेते अजित दादांना आपले नेते मानतात त्यांनी लावलेल्या पोस्टरवरुन अजितदादांचे फोटो गायब झालेले दिसत आहेत. ही परिस्थिती आठ-दहा दिवसातच येत असेल तर भविष्यात पुढे काय परिस्थिती असेल याचा अंदाज दिसून येतो,"

"जे नेते विचारांचे राहिले नाहीत तर ते नेत्यांचे कसे राहतील, असा प्रश्न रोहित पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. ज्या साहेबांनी 35 वर्ष त्यांना ताकद दिली ते साहेबांचेच राहिले नाहीत तर ते नव्या नेत्याचे (अजित पवार) कसे राहतील असा प्रश्न माझ्यासारख्या नेत्याला पडत आहे, हाच प्रश्न त्या नेत्याला (अजित पवार) पण पडत असावा,"असे रोहित पवार यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये पक्षफुटी वरुन 'फडवणीस हे म्हणजे नागपूरला लागलेला कलंक' आहे असं म्हणत जहरी टीका केली होती. त्यावर रोहित पवार म्हणाले, "ते कलंक आहेत की नाही हे इतर नेते बोलतील. पण सामान्य जनतेला जे समजायचे ते कळालं आहे. मी राजकारणात येत असताना एक चांगला वेगळा विचार करून आलो आणि लोकांनीही मला पसंती देत आमदार केले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ज्या पद्धतीचे राजकारण मी पाहत आहे त्यामध्ये अत्यंत चुकीच्या विचारांचा चिखल झालेला मला दिसतोय. या चिखलामध्ये आम्ही सर्वच जण अडकलो आहे,"

"आम्ही आमचा स्वाभिमान कुठेही अजून गहाण ठेवलेला नाही, हा चिखल साफ करायचा असेल तर एका चांगल्या थोर नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्हा युवकांनाच करावा लागेल. जे संघर्ष करतील ते लोक पुढे जातील, जनताही त्यांना साथ देईल अन्यथा इतर काही जण या चिखलामध्ये संपून जातील," असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT