Sameer Wankhede, Nawab Malik
Sameer Wankhede, Nawab Malik sarkarnama
मुंबई

देशसेवेसाठी तुरुगांत टाकले तरी चालेल : समीर वानखेडेंचे मलिकांना प्रत्युत्तर

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अंमली पदार्थ प्रतिबंधक (एनसीबी) मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांच्या जोरदार सामना रंगला आहे. समीर वानखेडे हे दुबईला गेले होते, असा आरोप मिलक यांनी केला होता. त्यावर वानखेडे यांनी लगेच प्रत्युत्तर दिले आहे. मी दुबईला गेलोच नाही, देशसेवा करण्यावरुन आणि ड्रग्ज हटवण्यावरुन मला जेलमध्ये टाकत असतील तर मी त्यांचे स्वागत करतो, असे वानखेडे म्हणाले.

या संदर्भात नवाब मिलक यांनी ट्वीट केले होते. त्यामध्ये त्यांनी काही फोटो शेअर केले होते. त्यावरुन समीर वानखेडे हे दुबईला गेले असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. त्यावर बोलताना वानखेडे म्हणाले, मी या गोष्टीची घोर निंधा करतो. मी दुबईला गेलो नाही, ही चुकीची माहिती आहे. जी तारीख ते सांगत आहेत, डिसेंबर महिन्यात मी त्यावेळी मुंबईतच होतो. ते या गोष्टीचा तपास किंवा शाहनिशा करु शकतात, असे आव्हान त्यांनी केले. खंडणी हा खूप घाणेरडा व खालच्या पातळीचा शब्द आहे. मी सरकारच्या परवानगी घेऊन आपल्या मुलांसोबत मालदीवला गेलो होतो. त्याला तुम्ही खंडणी म्हणत होते, हे चुकीचे आहे. ते जर मला जेलमध्ये टाकत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मी एक खुप छोटा सरकारी कर्मचारी आहे. ते खूप मोठे मंत्री आहेत. देशसेवेसाठी आणि ड्रग्ज हटवण्यावरुन मला जेलमध्ये टाकत असतील तर मी त्यांचे स्वागतच करतो, असे वानखेडे म्हणाले.

मी केंद्र सरकारचा कर्मचारी आहे. मी माझ्या वरिष्ठांचा सल्ला घेईल आणि त्यांच्या सल्ल्यानुसार कारवाई करेल. मी बॉलिवूडला टार्गेट करण्यासाठी आलो आहे, हा आरोप अत्यंत चुकीचा आहे. मागील पंधरा दिवसांपूसन माझ्या कुटुंबीयांवर शाब्दिक हल्ले केले जात आहेत. नवाब मलिक यांच्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असे वानखेडे यांनी सांगितले.

नवाब मलिक काय म्हणाले होते?

भाजपचे लोक लोकांवर दहशत निर्माण करून वसुली करत आहेत. समीर वानखेडे हा बोगस, ह्याचा बाप बोगस, ह्याच्या घरातील लोक बोगस आहेत. तुझे बाप कितीही दबाव टाकत असतील, पण हा नवाब मलिक तुझ्या बापाला घाबरणार नाही, अशा शब्दांत मलिक यांनी वानखेडेंवर निशाणा साधला होता. समीर वानखेडे प्रसिद्धसाठी लोकांना अडकवण्याचे काम करत आहे. हा वानखेडे भाजपवाल्यांचा म्होरक्या आहे. तो बोगसगिरी करतो, त्यामुळेच एनसीबी सध्या करत असलेल्या केसेस या बोगस आहेत. ह्या सर्व केसेस कोर्टात टिकणार नाहीत. आगामी काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संदर्भात चालणारे तोडपाणी हे मालदीव आणि दुबईत चालते आहे, हे आम्हाला समजलंय, ही तोडपाणी थांबण्याचे काम मी करणार आहे, असे नवाब मलिक म्हणाले होते.

भाजपचे लोक ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आदी संस्थांच्या माध्यमातून लोकांना भीती दाखवण्याचे काम करत आहेत. पण हा नवाब मलिक कुणाच्या बापाला भिणारा नाही. फडणवीस म्हणतात की राज्याचे अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल, माझे तर त्यांना आव्हान आहे की, त्यांनी आम्हाला तुरुंगात टाकावेच, असे आव्हानही मलिक यांनी फडणवीस यांना दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT