Mumbai, 21 July : दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. दिल्लीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचे आंंदोलन सुरू आहे. अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत, त्यांना विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेटून पाठिंबा दर्शविला आहे. दुसरीकडे महायुतीमधील रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी इंडिया आघाडीचे आंदोलक हे देशात आतंकवादासारखी परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत, म्हटले आहे. त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी खरमरीत भाषेत उत्तर दिले आहे.
सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत आंदोलनावर अनेक प्रश्न निर्माण केले होते. त्यात आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आहे की सरकारचा राजीनामा मागण्यासाठी आहे, असा सवाल केला. तसेच केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र अशी घोषणा देत सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नये, असेही सूचवले आहे.
शिक्षण मंत्र्यांना अजिबात बदलू नये, उलट या आतंकवाद्यांना जशास तसे उत्तर द्यावे. कारण हा देश प्रगतिपथाच्या दिशेने जात आहे आणि हे सर्व अतृप्त आत्म्यांना सहन होत नाही, असाही आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांना आतंकवादी म्हटल्याने संतापाची लाट उसळली आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी तर यावर विद्यार्थीच उत्तर देतील, असे म्हटले आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी मनसे स्ट्राइलने उत्तर दिले आहे.
ते म्हणाले, सदाभाऊ खोत यांचं डोकं एकदा तपासावं लागेल, कारण ते मनोरुग्ण झाले आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे मोठे भक्त झाले आहेत. त्यांना आठवत नाही का, त्यांनी केलेली आंदोलनं. त्या वेळी ते स्वतः काय अतिरेकी होते का?