Sandip Deshpande: मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करत मनसेनं भाजपविरोधात रान पेटवलं होतं. त्याच मनसेनं कल्याण-डोंबिवलीत मात्र भाजपसोबत युती केल्यावरुन मोठी टीका झाली होती. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेला धारेवर धरलं होतं. पण आता याच संजय राऊतांना मनसेनं कोंडीत पकडलं आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ही संधी सोडलेली नाही.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील वडेट्टीवार आणि धानोरकर गटामध्ये उफाळून आलेल्या वर्चवस्वाच्या प्रकारामुळं महापौर कोण होणार? यावरुन गोंधळ सुरु असताना सर्वात मोठा पक्ष असतानाही काँग्रेसला इथं महापौरपद गमवावं लागलं. कारण ज्या शिवसेनेच्या पाठिंब्याच्या भरवशावर काँग्रेसनं हा सगळा महापौरपदाचा घोळ घातला होता, तो भरवसाच ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका निर्णयामुळं धुळीस मिळाला. कारण ज्या शिवसेनेच्या नगरसेवकांमुळं काँग्रेसला बहुमताचा आकडा पार करता येणार होता. तो आकडा त्यांना गाठता आला नाही कारण आयत्यावेळी शिवसेनेनं भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं भाजपनं चंद्रपूरमध्ये आपला महापौर बसवला आणि काँग्रेसला ठेंगा दाखवला.
आता चंद्रपुरात शिवसेनेनं केलेल्या या प्रकारावरुन मनसेनं संजय राऊतांना डिवचलं आहे. याप्रकरणी संदीप देशपांडे म्हणाले, "मी संजय राऊतांची पत्रकार परिषद बघितली. यात ते सांगत होते की दोन काँग्रेसमध्ये भांडणं होती, मग आमच्याशी त्यांनी गंभीररित्या चर्चा केली नाही. वैगरे वैगरे वैगरे. म्हणजे तुम करे तो रासलीला आणि हम करे तो कॅरेक्टर ढिला अशा प्रकारची संजय राऊतांची वागणूक बरी नाही. तुम्ही काँग्रेसबरोबर बसायला पाहिजे होतं ना मग महाविकास आघाडीचा भाग असताना, तिकडं तुम्ही भाजपसोबत कसे काय गेलात? तुम्हाला ते सगळं चालतं, योग्य, बरोबर.
दुसऱ्यांनी केलं की मग राजू पाटील हे भाजपला विकले गेलेत हे असं झालं ते तसं झालं वैगरे. हे कोणी घडवून आणलं हे सर्वांना माहिती आहे. यामागे कोणाचा हात होता. ठाकरेंच्या शिवसेनेतील कोणाचा यामागं हात होता, कुठल्या नेत्यानं हे सर्व घडवून आणलं. एकदा त्यांनी त्यांच्यापण घरात विचारलं पाहिजे. संजय राऊतांना अंधारात ठेवलं की त्यांनी स्वतः डोळ्यावर पट्टी बांधून घेतली हे पण बघावं लागेल, अशा तिखट शब्दांत संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना डिवचवलं आहे.