Sanjay Pandey -Mumbai Police Commissioner, Sanjay Pandey News
Sanjay Pandey -Mumbai Police Commissioner, Sanjay Pandey News 
मुंबई

जनतेशी नीट वागा; आयुक्त पांडेंचा पोलिसांना सज्जड दम

सरकारनामा ब्युरो

उत्तम कुटे

पिंपरी : राज्याचे प्रभारी पोलिस प्रमुख तथा डीजीपी असताना दर आठवड्याला संजय पांडे (Sanjay Pandey) हे पोलिस दलाशी फेसबुक संवाद साधत होते. याव्दारे ते आपण गेल्या आठवड्यात केलेल्या कामाचा अहवाल ते जनतेसमोर ऑनलाईन मांडत होते. पुढील आठवड्यात करणाऱ्या कामांची यादीही देत होते.आतापर्यंत गेल्या कित्येक वर्षात न सुटलेल्या पोलिसांच्या अनेक समस्या या उपक्रमाव्दारे मार्गी लागल्या आहेत. तो त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून या महिन्याच्या सुरवातीला रुजू होताच पुढे सुरुच ठेवला आहे. पण, त्या समस्या आता ते थेट मुंबईकरांशी या फेसबुक लाईव्हव्दारे संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करीत आहेत. (Sanjay Pandey News)

मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच त्यांनी आपला मोबाईल नंबर सार्वजनिक केला. तसेच मुंबई पोलिसांशी सोशल मिडियावर आपापली गाऱ्हाणी मांडण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. त्याचा निपटारा ते दर आठवड्याला मुंबईकरांशी फेसबुक लाईव्हमधून करीत आहेत. असा तिसरा ऑनलाईन संवाद हा रविवारी (ता.२०) झाला.

त्यात त्यांनी नागरिकच नसते,तर पोलिस दल व पोलिस आयुक्त म्हणून मी सुद्धा नसतो, असे सांगत पोलिस ठाण्यात येणाऱ्या सर्वांशी नीट वागा, असा सक्त आदेश अंमलदारांना दिला. त्यांना अरे, तुरे करू नका. तक्रारदाराला नीट वागणूक मिळाली नाही, तर मुंबई पोलिस दलाला काळीमा फासणारी ती बाब ठरेल, असे त्यांनी बजावले. त्याचवेळी पगावाढ, बढती अशा इतर सर्व प्रश्नांसाठी माझा दरवाजा तुमच्यासाठी सताड उघडा आहे, असे पोलिस दलाला आश्वस्तही त्यांनी केले.

शहरातील गृहनिर्माण संस्था तथा हौसिंग सोसायट्यांचे अध्यक्ष व सरचिटणीस यांना त्यांनी कडक इशारा दिला आहे. मेटेंनन्स न दिल्याने रहिवाशी सदस्यांचे वीज जोड आणि पाणी तोडणे हे बेकायदेशीर असून अशी मनमानी करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिस कायदा नाही,तर आय़पीसीनुसार कडक कारवाई केली जाईल, असा दम त्यांनी भरला आहे. तसा आदेश त्यांनी आपल्या दलाला दिला आहे. या बेबंदशाहीमुळे इमारतीत राहणाऱ्या ज्येष्ठांचे खूप हाल होतात. तसेच ते तक्रारीसाठी बाहेरही पडू शकत नाहीत, ही स्थिती त्यांनी लक्षात घेऊन हा कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार चेंबूर येथील काही गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत.त्यांच्याजोडीने त्यांनी

शहरातील बिल्डर तथा विकसकांनाही कामाची वेळ ठरवून दिली आहे. कारण २४ तास सुरु असलेल्या त्यांच्या कामामुळे चाकरमान्यांनासह ज्येष्ठांना मोठा त्रास होत होता. त्यामुळे सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंतच ही कामे करावीत,अन्यथा कारवाई केली जाईल,असे त्यांनी सांगितले आहे.

कोरोना नियंत्रणात आल्याने व त्याचे निर्बंध सैल झाल्याने डीजे लावून व लाऊडस्पीकरवर कॉमेंट्री करीत क्रिकेट, फूटबॉल खेळला जाऊ लागला आहे. पण, म्यझिक तथा लाऊडस्पीकर लावून खेळ खेळण्याची गरज नसल्याकडे आयुक्त पांडे यांनी तरुणाईचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे ध्वनीप्रदूषण,तर होतेच शिवाय ज्येष्ठांनाही त्रास होते.परिणामी इतरांना त्रास होणार नाही एवढाच आवाज ठेवा अन्यथा त्याप्रकरणीही पोलिस गुन्हे दाखल करतील,असा इशारा त्यांनी दिला आहे.नो एंट्रीसह इतर वाहतुकीचे कुठलेही नियम तोडू नका,असे आवाहनही त्यांनी विशेषकरून तरुणांना केले आहे.

त्यामुळे गुन्हा दाखल होऊन तुमचे करिअर उध्वस्त होऊ शकते,असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे. काऱण गुन्हा दाखल झाला,तर तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.नवरा-बायकोतील घरघुती वाद पोलिस ठाण्यापर्यंत येत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.शक्यतो ते घरातच सोडवा,कारण पोलिस ठाण्यात आल्यावर नात्यात दुरावा येऊ शकतो.मात्र,विषय गंभीर असल्यास पोलिस नक्की सहकार्य करतील,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.कुठलीच मार्गदर्शक तत्वे नसल्याने शहरात पदपथावरील फेरीवाल्याचा मोठा प्रश्न आहे,असे ते म्हणाले. पण, मुंबई महापालिकेच्या मदतीने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल,असे त्यांनी सांगितले.

आपल्या पोलिस दलाला काही उद्दिष्टे आय़ुक्त पांडेंनी दिली आहेत. त्यातील पहिले आहे दररोज एकातरी माणसाला मदत करायचे. दुसरे एखादी,तरी अनुचित घटना रोखण्याचे. सायबर क्राइमच्या अभ्यासाचे तिसरे ध्येय त्यांनी दिले आहे. तर चौथे आणि सर्वात महत्वाचे टार्गेट आहे, ते तंदुरुस्ती तथा फिटनेसचे. त्यावरून व त्यातही मोठ्या पोटावरून पन्नाशीतील पोलिस कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले जाते.त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी काळजी घ्या, त्यासाठी रोजच्या दैनदिन कामातून फक्त ३० ते २० मिनिटं काढून व्यायाम करा, ज्यामुळे थोडं,तरी फिटनेसमध्ये रहाल, पौष्टिक खा,असा लाखमोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे. २६ /११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्यात शहिद झालेल्या तुकाराम ओंबाळेंच्या गिरगाव येथील स्मृतीस्थळावर फक्त मराठीत फलक आहे. मराठी न समजणाऱ्या व मुंबईला भेट देणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांना ओंबाळे तथा मुंबई पोलिसांची कामगिरी आणि धडाडी कळावी म्हणून या स्मृतीस्थळी इंग्रजीतही माहितीचा फलक लावला जाईल,असे सांगत त्यांनी या आठवड्याच्या फेसबुक लाईव्हचा समारोप केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT