Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Video Sanjay Raut : आरक्षणाच्या वादाला कोण कारणीभूत? संजय राऊतांनी घेतलं थेट नाव

Jagdish Patil

Mumbai News, June 22 : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. दोन्ही समाजाचे नेते आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे महायुती सरकार चांगलंच कोंडीत सापडलं आहे. मात्र, या परिस्थितीवर तोडगा काढायचा असेल तर केवळ सरकारचं शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांकडे गेल्यानं हा प्रश्न सुटणार नाही. उपोषणकर्त्यांचा सरकारवर विश्वास नाही. (Maratha and OBC Reservation)

त्यामुळे यावर सर्वपक्षीय समिती आणि सर्वपक्षीय चर्चा हा एकच उपाय असल्याचं मतं शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय राज्यसह देशभरातून आरक्षणासाठी होणारी वाढती मागणी, सर्व समाजात वाढलेलं मागासलेपण याला केवळ मोदी सरकारचं अपयश कारणीभूत असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नेहमीप्रमाणे राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, "आरक्षणावर आता अभ्यास सुरू आहे. बिहारमध्ये वाढीव आरक्षण होतं ते कोर्टाने मान्य केलं नाही. पन्नास टक्क्यांवर असणारं आरक्षण कोर्टाने रद्द केलं. महाराष्ट्रात आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे, तो सरकारला खरोखर संपवायचा असेल तर राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांना, नेत्यांना चर्चेत सामावून घेणं हा एकच पर्याय आहे.

उपोषणकर्त्यांकडे केवळ शिष्टमंडळ जाऊन हा प्रश्न सुटणार नाही. कारण कोणत्याही समाजाचा नेता आणि उपोषणकर्ते सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके (Manoj Jarange Patil and Laxman Hake) या दोघांनीही आमचा सरकारवर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जर यांचा सरकारवर विश्वास नसेल तर मग अशा वेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळ किंवा चर्चा हाच एकच मार्ग आहे. मात्र, तरीही सरकारने प्रयत्न सोडू नयेत. सर्वांना शिष्टमंडळमध्ये सामावून घेऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा व्हायला हवी", असं राऊत म्हणाले.

मराठा-ओबीसी वाद दुर्दैवी

राज्यातील मराठा-ओबीसी वाद हा दुर्दैवी आहे. कोणाच्याही ताटातलं काढून कोणालाही देऊ नये, ही शिवसेनेची भूमिका आहे. तसंच आज सर्व समाजामध्ये मागासलेपण आहे, याला नरेंद्र मोदींची (Narendra Modi) शेती, आर्थिक, उद्योगा संदर्भातील धोरण कारणीभूत आहेत. मोदी सरकार गेल्या दहा वर्षात पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे या देशातील अनेक समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याची टीका राऊत यांनी येवेळी केली.

शिवाय आरक्षणावरुन महाराष्ट्रमध्ये जसा वाद सुरु आहे, जे चित्र आहे तसं गुजरात, राजस्थान, हरियाणा प्रत्येक राज्यात आरक्षण हवं आहे. नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये राखीव जागा हव्या आहेत. याला केवळ नरेंद्र मोदींचं अपयशी आणि करंट नेतृत्व कारणीभूत असंल्याचंही राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT