Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut Contest Loksabha: संजय राऊत म्हणतात, निवडणूकच काय पक्षाने आदेश दिल्यास तुरुंगातही जाईन...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News: शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे ईशान्य मुंबई मतदासंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पक्षाने आदेश दिला तर आम्ही काहीही करतो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज, पक्षप्रमुखांचा आदेश मानणाऱ्यांपैकी मी आणि माझे कुटुंब आहे, त्यामुळे पक्षाने आदेश दिल्यास निवडणूकच काय तुरुंगातही जाईन, अशी भूमिका मांडत खासदार राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Sanjay Raut said about contesting Lok Sabha elections from North East Mumbai)

ईशान्य मुंबई मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे मनोज कोटक हे खासदार आहेत. त्यापूर्वी २०१४ मध्ये किरीट सोमय्या हे खासदार होते, तर २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील हे खासदार होते. गेल्या वेळी शिवसेनेच्या दबावामुळेच सोमय्या यांचे तिकिट कापून कोटक यांना देण्यात आले होते. या मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद आहे. आता राष्ट्रवादी सोबत आहे, तसेच संजय दिना पाटीलही शिवसेनेसोबत आहेत, त्यामुळेच या मतदारसंघातून संजय राऊत यांना मैदानात उतरविण्याचे डावपेच शिवसेनेकडून आखले जात आहेत.

या मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत. महाविकास आघाडीकडे तीन आमदार आहेत. त्यातही शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. राष्ट्रवादी सोबत असल्याने तसेच, संजय दिना पाटील हेही शिवसेनेसोबत आल्यामुळे मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना संजय राऊत यांच्या नावाची चाचपणी करण्यात आली आहे. राऊत हे ईशान्य मुंबईतील भांडूपचे रहिवासी आहेत. त्यांचे धाकटे बंधू सुनील राऊत हे भांडूपचे आमदार आहेत.

निवडणूक लढविण्यासंदर्भात संजय राऊत म्हणाले की, पक्षाने आदेश दिला, तर आम्ही काहीही करतो. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेले लोक आहेात. पक्षाची गरज, पक्षप्रमुखांचा आदेश मानणाऱ्यांपैकी मी आणि माझे कुटुंब आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिल्यास निवडणुकाच काय तर तुरुंगातही जाईन. ईशान्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून मीच काय तर सामान्य शिवसैनिकसुद्धा दोन ते सव्वा दोन लाख मतांच्या फरकाने निवडून येईल, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

नीतेश राणेंचे आव्हान

संजय राऊत यांनी मुंबईपेक्षा रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढवावी. आमच्या मैदानात यावं, त्यांची काय इज्जत आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला कळेल. हिम्मत असेल तर मुंबईत काय लढता. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये तुमचेच खासदार आहेत. विनायक राऊत जाऊन संजय राऊत येतील. आम्ही या राऊतांना गाडून टाकू, असे आव्हान आमदार नीतेश राणे यांनी राऊतांना दिले आहे.

....तर एक खासदार कमी होण्याचा धोका

संजय राऊत हे २०२२ पासून राज्यसभेवर आहेत. ते लोकसभेची निवडणूक लढवून जिंकले, तर त्यांच्या जागेवर राज्यसभेची निवडणूक लागू शकते. सध्या शिवसेनेकडून एक खासदार निवडून येण्याइतकी आमदारांची संख्या विधानसभेत नाही, त्यामुळे संजय राऊत जरी लोकसभेला निवडून आले तरी पक्षाचा राज्यसभेत एक खासदार कमी होण्याचा धोका आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT