Sanjay Raut, Sunil Tatkare, Girish Mahajan Sarkarnama
मुंबई

Mahayuti News : संजय राऊतांची 'ती' टीका महायुतीच्या नेत्यांच्या जिव्हारी; सुनील तटकरेंसह महाजनांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले...

Jagdish Patil

Mumbai News, 28 July : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांची गुप्तपणे भेट घेतल्याच्या चर्चांवर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर बोचरी टीका केली आहे.

'भाजपचं महाराष्ट्राबाबतचं कपट किती आधीपासून सुरु होतं, हे आता हळू हळू स्पष्ट होत असून अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे राज्यातील मोठे कलाकार आहेत,' अशी टीका राऊत यांनी केली.

राऊतांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपचे (BJP) नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीची स्थापन झाली, तेव्हा ते कोणाचं कपट होतं? असा सवाल सुनील तटकरे यांनी संजय राऊतांना विचारला आहे.

2019 मध्ये ज्यावेळी शिवसेना-भाजप एकत्र लढले आणि त्यानंतर याच संजय राऊतांनी शरद पवारांकडे जात महाविकास आघाडीची स्थापना केली. त्याला काय म्हणायचं? मुळात 2019 ची निवडणुकीत जनतेने शिवसेना आणि भाजपला कौल दिला होता. जनमताला छेद देण्याचं काम राऊतांनी केलं. मग ते कपट कोणाचं होतं? याचं उत्तर आधी संजय राऊतांनी द्यावं, अशा शब्दात सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं.

तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील संजय राऊतांवर पलटवार केला. ते म्हणाले, "मुळात नटसम्राट कोण आहे, कॉमेडी कोण करतं, हे राज्यात सर्वांना माहिती आहे. या राज्यात नकलाकार कोण आहेत? हे देखील सर्वांना माहिती आहे. त्यामुळे संजय राऊतांनी याबाबत बोलूच नये, त्यांनी सकाळी भोंगा वाजवण्याचं काम करत राहावं."

राऊत नेमकं काय म्हणाले?

अजित पवारांनी अमित शहा यांची गुप्तपणे भेट घेतल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, भाजपचं महाराष्ट्राबाबतचं कपट किती आधीपासून सुरु होतं, हे हळू हळू स्पष्ट होतय. महाराष्ट्राला नाटकाची मोठी परंपरा आहे. श्रीराम लागूंपासून ते प्रशांत दामलेंपर्यंत असे मोठे कलाकार महाराष्ट्राने दिले आहेत. आपल्या राज्याला नाट्यश्रृष्टीची मोठी परंपरा आहे. मात्र, या नाट्यसृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलं. यांनाही नाट्यसृष्टीत सामावून घेतलं पाहिजे.

हे तिन्ही लोकं उत्तमपणे मेकअप करतात, चेहरे बदलतात. अजित पवार गुप्तहेराप्रमाणे नाव आणि चेहरा बदलून, खोट्या मिशा लाऊन दिल्लीत शहांना भेटायला जात होते. फडणवीस आणि शिंदे रात्री वेश बदलून रस्त्यावरच्या दिव्या खाली बसून सरकार कसं पाडायचं, यावर चर्चा करत होते. ही फार मोठी गोष्ट आहे. हे लोक मोठे कलाकार आहेत. यांनी राजकारणात येऊन आपल्या नाट्यसृष्टीचं मोठ नुकसान केलं, असा टोला राऊतांनी लगावला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT